मुंबई – जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरस्थिती निर्णाण झाली होती. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतीपीकांचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत 3 ऑगस्ट 2021 रोजी घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार 125 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
जुलै ते ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकांकरीता वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्य निधीतून अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्याकरिता वाढीव दराने राज्य निधीतून एकशे पंचवीस कोटी सात लाख रुपये निधी विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.