पिंपरी – राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईतील ड्रग्स कारवाई दरम्यान साक्षीदार अथव पंच म्हणून ज्या लोकांना बरोबर नेले. ते एका पक्षाचे राजकीय कार्यकर्ते आहेत.
तर, किरण गोसावी हा पुण्यातील फरासखान्याच्या केसमध्ये एका फरार आरोपी आहे. फरार आरोपीला घेऊन जर “एनसीबी’ पंच करायला लागली तर हे कितपत बरोबर आहे? असा सवाल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाइकांवर आयकर विभागाच्या सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या छापेमारीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी वक्तव्य केले आहे. “एखाच्या घरी चौकशी करणे ठीक आहे. परंतु, त्याच्या सगळ्याच नातेवाइकांच्यासुद्धा घरी जाणे आणि त्रास देणे हे काही बरोबर नाही’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच सत्ताधारी पक्षाकडून यंत्रणेचा गैरवापर करण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
वळसे-पाटील म्हणाले की केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेल्या एजन्सींचा आणि सत्तेचा वापर हा राजकीय कारणासाठी करत आहे. यापूर्वीच्या काळात राजकारणामध्ये कधीही अशी परिस्थिती पाहिली नव्हती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने, विविध संस्था, त्यांच्या तीन बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला. तसेच त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावरही छापा टाकला. ही कारवाई सलग तिसऱ्या दिवशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
या कारवाईवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. याशिवाय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील राज्यात ठिकठिकाणी या कारवाईचा निषेध केला आहे.