पुणे- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) राष्ट्रीय महामार्गांवरील टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील सर्व टोलनाक्यांवर शुक्रवारपासून (दि.1) हे बदल होणार आहेत. एनएचएआय’ने टोलच्या दरात 10 ते 65 रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर रोज नव-नवीन रेकॉर्ड मोडत आहेत.
त्याचदरम्यान आता टोल दरवाढीमुळे वाहनचालकांच्या खिशावरील भार वाढणार आहे. भारत हा एकमेव देश आहे की येथे दरवर्षी वाहनाच्या संख्येबरोबर टोल दरवाढ होते. अनेक टोल नाक्यांवर पायाभूत सुविधांचा अभाव आहे. काही महामार्गांच्या दुरुस्तीचे काम अर्धवट आहे, मात्र तरीही दरवर्षी ही टोलदरवाढ केली जाते. यापूर्वी 2021 मध्ये टोलच्या दरात 5 टक्के वाढ करण्यात आली होती.
या टोलनाक्यांवर होणार दरवाढ
पुणे-सोलापूर (राष्ट्रीय महामार्ग क्र.9) महामार्गावरील पाटस आणि सरडेवाडी टोलनाका, पुणे-नाशिक (राष्ट्रीय महामार्ग क्र.50) महामार्गावरील हिवरगाव पावसा आणि चाळकवाडी टोलनाका, पुणे-बेंगळुरू (राष्ट्रीय महामार्ग क्र.4) महामार्गावरील खेड शिवापूर आणि आणेवाडी या टोलनाक्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो.