सातारा (प्रतिनिधी) – ज्या शिक्षकांकडून समाजाने आदर्श घेवून त्यांच्या विचारांवर आचरण करायचे त्याच शिक्षकांकडून मात्र शिक्षक विभागाची एक प्रकारे बदनामी होत आहे. याचा प्रत्यय भरतगाव (ता. सातारा) येथील जिल्हा परिषद शाळेत आला असून दोन महिला शिक्षिकांमध्ये मारामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजता शाळेत घडली आहे. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने मात्र शिक्षण विभागात खळबळ उडाली असून याबाबत शिक्षण विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भरतगाव शाळेतील सौ. रंजना चौरे यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजता शालेय पोषण आहाराची रेकॉर्ड वही तपासत असताना शाळेतील शिक्षिका मनिषा बबन भुजबळ यांनी वाद घालून मारहाण, शिवीगाळ केली.या तक्रारीवरुन भुजबळ यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, मनिषा भुजबळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शालेय पोषण आहारच्या रेकॉर्डला शाळेतील शिक्षिका रंजना चौरे यांनी व्हाईटनर लावले. याबाबत विचारणा केली असता हाताने मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली. या तक्रारीवरुन रंजना चौरे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार गवळी चौकशी करत आहेत.
याबाबत शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता असा प्रकार घडला असून याच्या चौकशीसाठी काही अधिकार्यांनी बुधवारी शाळेस भेट दिली असल्याचे सांगण्यात आले.