मुंबई (प्रतिनिधी) – दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही वीजेचा दरमहा 100 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्याच्या निर्णयावर राज्य सरकार विचारधीन आहे. यासाठी उर्जा खात्यातील अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. तीन महिन्यांत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर सरकार पातळीवर या प्रस्तावावर विचार करण्यात येईल व समग्र चर्चेनंतरच मोफत वीजेबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
100 युनिटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना येत्या वर्षभरात मोफत वीज देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा आहे. त्यासाठी विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत. महावितरण तसेच उर्जा खात्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे, गळती रोखणे, वसुलीचे नवीन निकष तयार करून सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.
वीज उत्पादन खर्च कमी करण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. आर्थिकस्थिती सुधारल्यानंतर वीजदरात दिलासा देता येउ शकतो. महावितरणसह तिन्ही कंपन्यांना त्यांच्या खर्चात कपात करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी योजनाही तयार करण्यात येणार आहे. 100 युनिटपर्यंतच्या वापरकर्त्यांना कसा दिलासा देता येउ शकेल यासाठी उर्जा खात्यातील अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतरच मोफत वीजेबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत 200 युनिटपर्यंतची वीज मोफत केली आहे. 201 ते 401 युनिटपर्यंतच्या वापरकर्त्यांना 50 टक्के सवलत आहे.