श्रीगोंदा – दुसरीच व्यक्ती उभी करून बनावट आधारकार्डद्वारे जागेची विक्री करून नगरच्या एक व्यापार्यास तब्बल दीड कोटी रुपयांना फसविल्याची धक्कादायक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित व्यापार्याच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सूर्यकांत रावसाहेब कोल (रा. स्टेशन रोड, मल्हार चौक, नगर) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात कोल यांनी आपली एक कोटी 55 लाख 21 हजार 300 रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून विशाल संपत वाघमारे (रा. कोळगाव), रवी संजय ढवळे (रा. काळकाई चौक, श्रीगोंदा), विश्वजित रमेश कासार (रा. वाळकी ता. नगर), सुनील फक्कड आडसरे (पत्ता माहीत नाही), जमीन मालकाच्या जागी उभ्या केलेल्या दोन व्यक्ती, इंद्रजित रमेश कासार (रा. वाळकी, ता. नगर), कोमल विश्वजित कासार (रा. वाळकी, ता. नगर) या आठ जणांवर फसवणुकीसह विविधे गुन्हे शुक्रवारी रात्री श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
वरील आरोपींनी कोल यांचा प्रथम विश्वास संपादन केला. आनंद केशव शेजवळ (रा. कळबादेवी, मुंबई) यांची 9 हेक्टर 89 आर जमीन विक्रीस असल्याचे त्यांनी कोल यांना सांगितले. कोल यांनी जागेची पाहणी करून हा व्यवहार करण्याचे ठरविले. खरेदीखत करण्याचे ठरल्यानंतर वरील आरोपींनी शेजवळ यांच्या जागी खरेदी खतासाठी बनावट व्यक्ती उभा केली.
त्यांचे आधारकार्ड देखील बनावट तयार करून ते सोबत जोडले. सुरवातीला खरेदीखत 9 हेक्टर 89 आरचे तयार करून त्यावर कोल यांची सही घेतली. कोल यांची सही झाल्यानंतर आरोपींनी खरेदीखताची कागदपत्रे बदलून 20 गुंठ्याचेच खरेदीखत तयार केले अन् 9 हेक्टर 89 आर क्षेत्राचे पैसे घेऊन 20 आर एवढेच क्षेत्र तेही बनावट व्यक्तीद्वारे देवून बनवेगिरी केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित माळी हे करत आहेत.
फसवणूक करणार्या टोळ्या कार्यरत ?
बनावट व्यक्ती उभी करून जमिनींची परस्पर विक्री केल्याच्या घटना या आधी देखील येथे घडल्या आहेत. जागेचा मालक बाहेरचा अन् घेणाराही तालुक्याबाहेरील, यामुळे असे ट्रॅप यशस्वी होत आहेत. खरेदी पूर्ण करण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागत असल्याचे समविचारी व्यक्ती एकत्र येऊन शब्दच्छल करीत धनिकाला भूलवित आहेत. त्यामुळेच धनिकांची फसवणूक करणार्या टोळ्या येथे कार्यरत आहेत. त्यातून तालुक्याची देखील बदनामी होत आहे.