नगर – दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या मागण्यांची दखल घेण्याऐवजी केंद्र सरकार त्यांचे आंदोलन हुकूमशाहीने दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ नगर-पुणे महामार्गावर आज ‘चक्का-जाम’ आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
शहरातील मार्केट यार्ड चौकात त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अखेरीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करुन ताब्यात घेत महामार्ग खुला केला. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नव्याने पारित केलेले शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे, वीजबिल विधेयक 2020 तसेच कामगार विरोधी संहिता रद्द करावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.
हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे, आर्किटेक्ट अर्शद शेख, युनूस तांबटकर, प्रा. डॉ. महेबूब सय्यद, अंबादास दौंड, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे, किसान सभेचे धोंडीभाऊ सातपुते, सिंधूबाई त्रिमुखे, बाळासाहेब पवार, विष्णू म्हस्के, संध्या मेढे, बाळासाहेब सागडे, वैभव कदम, अब्दुल गनी शेख, भाऊसाहेब थोटे, रवींद्र फुलसौंदर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.