चाफळ -करोना विषाणूने जगभर थैमान घातले असून देशासह राज्यात हाहाकार उडाला आहे. जिल्ह्यातही आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात असून सर्वत्र कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. करोना विषाणू प्रादुर्भावामुळे होणारी जिवीतहानी टाळण्यासाठी तसेच संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा महत्त्वाचा भाग म्हणून जाळगेवाडी ता. पाटण येथील आपत्ती व्यवस्थापन समितीने तसेच ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने चौदा दिवस होम क्वारंटाईन होण्याचा निर्धार केला आहे.
चाफळ विभागातील डेरवण येथील करोनाग्रस्त दहा महिन्यांच्या बाळाच्या कुटुंबियांचे वास्तव्य जाळगेवाडी येथे होते. सुदैवाने डेरवण येथील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी, खबरदारी म्हणून स्वयंस्फूर्तीने होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय गावाच्या भल्यासाठी एकमताने घेण्यात आला आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
गावामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये तसेच गावातील आजारी माणसांची दवाखान्यात जाण्याची अडचण होऊ नये म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते भरत साळुंखे यांनी आपली दुचाकी तसेच चारचाकी वाहने गावाच्या हद्दींवर लावली आहेत. याद्वारे विनामूल्य सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांची सोय झाली आहे.
त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थांना बॅंकेतून पैसे काढण्यासाठी गावातच खास सोय करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार ग्रामस्थांना बॅंकेतून पैसे आणून दिले जात आहेत. याप्रकारे जाळगेवाडीचा आदर्श इतर गावांनी घेतल्यास येणाऱ्या काळात करोनावर निश्चितच मात करता येईल, यात शंकाच नाही.
दरम्यान, जाळगेवाडीचे सरपंच शिवाजीराव काटे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे तसेच कमिटी सदस्यांनी चोरीछुपे चाफळ व उंब्रज येथे जाणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली चाफळ पोलिसांनी गावाच्या हद्दीवर चोख बंदोबस्त ठेवला आहे.जाळगेवाडी ग्रामस्थांच्या होम क्वारंटाईन निर्णयाबाबत परिसरातून कौतुक होत आहे.