लोणीकंद, (वार्ताहर) –हवेली तालुक्यातील बुर्केगाव येथे एकाच वेळेस चार रोहित्र चोरी झाल्याची घटना घडली. हवेली तालुक्यात वारंवार रोहित्रांच्या होणार्या चोर्यांमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना ऐन उन्हाळ्यात एकाच दिवशी 4 रोहित्र व शेतकर्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरीला गेल्याने शेतकरी पुरते हैराण झाले होते.
ऐन उन्हाळ्यात झालेल्या चोरीमुळे पिकांना पाणी देता येत नव्हते, पिके जळून चालली होती. महावितरण च्या अधिकार्याकानडे पाठपुरावा करून देखील रोहित्र उपलब्ध न झाल्याने शेतकर्यांनी हवेली तालुका शिवसेनाप्रमुख व महाराष्ट्र वीज विद्युत मंडळाचे सदस्य विपुल शितोळे यांच्याशी संपर्क करून डीपी बाबतीत पाठपुरावा करावा,
अशी विनंती केली असताना विपुल शितोळे यांनी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी राठोड, बाबरेकर, कोडीलकर यांच्याशी संपर्क करून रोहित्र त्वरित उपलब्ध करून देण्याची विनंती केली व वारंवार पाठपुरावा करून शेतकरी व वीज अधिकारी कांबळे यांची समन्वय बैठक घेऊन चार डीपी बसवण्याबाबत तोडगा काढून पुढील दोन ते तीन दिवसातच विद्युत रोहित्र बसवले. यामुळे बुर्केगाव गावातील शेतकर्यांनी विपुल शितोळे यांच्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचे व वीज अधिकार्यांचे कौतुक केले.
नदी उशाला अन् कोरड घशाला
पूर्व हवेलीत सध्या रोहित्र चोर्यांचे प्रमाण वाढले असताना शेतकर्यांना वेळेवर विद्युत रोहित्र मिळत नसल्याने पाणी असूनही शेतीला पाणी देता येत नाही. डोळ्यादेखत शेतीमाल करपून जात आहे. नदी उशाला आणि कोरड घशाला अशी केविलवाणी अवस्था शेतकर्यांची झाली आहे.
रोहित्र चोरांना पकडण्यात पोलिसांचे अपयश
रोहित्र चोरांना लगाम घालणे कठीण बनले असून रात्र गस्त घालून गेल्यावर रोहित्र चोरीला जात आहेत. त्यामुळे पोलीस काय करत आहेत हे समजायला मार्ग नाही. पोलिसांचे हे सर्वात मोठे अपयश मानले जात असून या चोर्या कधी थांबणार व शेतकर्यांचा त्रास कधी कमी होणार हा प्रश्न सर्वसामान्य शेतकर्यांना पडला आहे.
सध्या सर्वत्र रोहित्र चोरीचे प्रमाण वाढले असता चोरी झालेल्या रोहित्रांच्या जागेवर नवीन रोहित्र देताना महावितरण ची दमछाक होत आहे. शेतकर्यांनीच आता पोलिसांच्या भरवशावर न बसता गट करून रात्र गस्त घालणे गरजेचे आहे. -विपुल शितोळे, सदस्य महाराष्ट्र वीज विद्युत मंडळ