हिंगोली – नांदेड येथून आपल्या मुलीची भेट घेऊन परत गावाकडे परतत असताना
सेनगाव ते येलदरी येथे नव्याने बांधकाम होत असलेल्या पुलाजवळील खड्ड्यात कार कोसळून चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्या कंत्राटदारासह कंपनीच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रकाश सोनवणे, गजानन सानप, त्र्यंबक थोरवे आणि विजय ठाकरे अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण लोणार येथील रहिवाशी आहेत. सेनगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या योजनेतून सेनगाव तालुक्यात राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. गेली अनेक वर्षांपासून सेनगाव ते येलदरी या महामार्गाचे काम कासव गतीने सुरू आहे. सदर काम कल्याण टोल कंपनीच्या कंत्राटदारांतर्गत चालू असून, कामावर कुठे दिशादर्शक किंवा सूचनाफलक न लावल्याने चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
लोणार येथील शिक्षक प्रकाश सोनवणे हे आपल्या तीन मित्रांसह नांदेड येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटावयास गेले होते. ते परत गावाकडे येत असताना गावालगतच नव्याने बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ त्यांची स्विफ्ट कार खड्ड्यात कोसळली. सदर खड्ड्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले असल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, सेनगाव ठाणे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे, पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे यांनी भेट देऊन पाहणी केली.
एकनाथ सोनुने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कल्याण टोल कंत्राटदारासह संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सेनगाव पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे करीत आहेत.