नवी दिल्ली – पंतप्रधान मोदी यांनी जी 7 राष्ट्रांच्या बैठकीतील भाषणात जगाला जे काही शिकवले आहे ते त्यांनी प्रत्यक्षात भारतात अंमलात आणून दाखवावे अशी सूचना माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केली आहे. मोदींनी जी 7 च्या बैठकीत लोकशाही आणि स्वातंत्र्य या विचारांचा आग्रह धरला होता. हीच तत्वे त्यांनी भारतात लागु करावीत असे चिदंबरम यांनी त्यांना आपल्या ट्विटर संदेशात सूचित केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींचे जी 7 मधील भाषण जसे प्रेरणादायी होते तसेच ते दुर्देवीही होते. त्यांनी जागतिक नेत्यांना जे शिकवले ते त्यांनी प्रथम भारतात अंमलात आणून दाखवले पाहिजे असे चिदंबरम म्हणाले.
कोविडच्या लढाईत भारताचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करून चिदंबरम यांनी म्हटले आहे की, भारत हा जगातील सर्वात अधिक कोविडग्रस्तांचा देश आहे आणि जगातील सर्वात कमी लसीकरण झालेला देश आहे. म्हणूनच त्यांनी जी 7 च्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहणे टाळले असावे असेही चिदंबरम यांचे म्हणणे आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या जी 7 या जगातील सर्वात श्रींमत राष्ट्रांच्या बैठकीला मोदींनी ऑनलाइन भाषण दिले होते.