श्रीगोंदा -तालुक्यातील बाबुर्डी येथील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या परप्रांतीय सख्या चार भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि.23) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मावसभाऊ मात्र सुदैवाने बचावला. नवाजीस सलीम अहमद (वय 9), दानेश सलीम अहमद (वय 13), अरबाज सलीम अहमद (वय 21), फैसल सलीम अहमद (वय 18), अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील बाबुर्डी येथील कैलास शिर्के यांच्या गुऱ्हाळावर उत्तर प्रदेशातील सलीम अहमद हे पत्नी व चार मुलांसह काम करीत आहेत. मंगळवारी (दि.23) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आई-वडिलांचा डोळा चुकवून पाच भाऊ गुऱ्हाळ मालक कैलास शिर्के यांच्या शेजारील दत्ता शिर्के यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. गे पाचही भाऊ शेततळ्यात उतरले.
शेततळ्यात सोडलेल्या ठिबकच्या पाईपला धरुन ते पोहत होते. त्यातील नवाजीसला डोक्यावर घेऊन अरबाज पाईपला धरून पोहत होता. परंतु अचानक पाईप तुटल्याने ते दोघे बुडू लागले. त्यामुळे फैसल आणि दानेज हे दोघे त्यांना वाचविण्यासाठी गेले. परंतु, दोघा भावांना वाचविण्यासाठी उतरलेल्यांसह चौघेही सख्खे भाऊ बडून मृत्युमुखी पडले. त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मावसभाऊ मात्र सुदैवाने यातून बचावला. या घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल बडे आणि पोलीस कॉस्टेबल प्रताप देवकाते हे घटनास्थळी गेले. या चारही भावंडांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात हे चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.