पुणे – राज्य शासनाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पीएच.डी अभ्यासक्रमच्या 10 जागांसाठी राज्यभरातून केवळ चारच अर्ज आले आहेत. एवढेच नव्हे, तर या चार अर्जातून तीन अर्ज तांत्रिक छाननी समितीकडून अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे परदेशी शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी एकाच विद्यार्थ्यांची निवड करणे राज्य शासनाला क्रमप्राप्त ठरले. राज्य शासनाकडून परदेशी शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध असताना, त्यास विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे 2018-19पासून राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. त्यात पीएच.डी आणि पदव्युत्तर पदवीसाठी प्रत्येक 10 अशा एकूण 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत होती. मात्र, शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून या योजनेत पदव्युत्तर पदवी-पदविका अभ्यासक्रमासाठी निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 10 ऐवजी 30 करण्यात आली. या योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर छाननी प्रक्रिया राबवून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी शासनाने आज प्रसिद्ध केली. त्यातून माहिती समोर आली आहे.
पदव्युत्तर पदवीसाठी 39 विद्यार्थी…
दरम्यान, पदव्युत्तर पदवीसाठी 39 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना मंजूर केलेली शिष्यवृत्ती गृह विभागाच्या चौकशीच्या अधीन राहून करण्यात आली आहे. चौकशीमध्ये चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येणार असल्याचे उच्च शिक्षण विभागाने स्पष्ट आले.