कोलकत्ता – पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे सध्या जोराने वाहू लागले आहे. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले यशवंत सिन्हा यांनी आज तृणमूल काँगेसमध्ये प्रवेश केला आहे. २०१८ सालीच राजकारणातून संन्यास घेतलेल्या यशवंत सिन्हा यांना पक्षात घेण्यामागे टीएमसीची काय योजना आहे? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यावेळी यशवंत सिन्हा म्हणाले कि, लोकशाहीची ताकद लोकशाहीच्या संस्था असतात. आज जवळपास सर्वच संस्था कमकुवत झाल्या आहेत. यामध्ये देशातील न्यायपालिकेचाही समावेश आहे. हे आता आपल्या देशासाठी मोठा धोका बनला आहे. हा कोणताही राजकीय लढा नसून लोकशाहीला वाचवण्यासाठी प्रयत्न आहेत, अशी टीका त्यांनी मोदी सरकारवर केली आहे.
Former BJP leader Yashwant Sinha joins Trinamool Congress in Kolkata pic.twitter.com/21P5IDcMab
— ANI (@ANI) March 13, 2021
दरम्यान, यशवंत सिन्हा देशातील राजकारणातील मोठा चेहरा आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थ, परराष्ट्र मंत्रालय सांभाळले होते. पक्षासोबत झालेल्या मतभेदांमुळे यशवंत सिन्हा यांनी भाजपची साथ सोडली. यशवंत सिन्हा यांनी वेळोवेळी मोदी सरकारच्या अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे. २०१८ साली त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली होती. परंतु, आता पुन्हा एकदा यशवंत सिंह राजकारणात सक्रिय झाले असून टीएमसीत प्रवेश केला आहे.