नवी दिल्ली -माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम बरेच दिवस कोठडीत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. न्यायालयांकडून चिदंबरम यांना न्याय मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
तिहार तुरूंगात चिदंबरम यांची भेट घेतल्यानंतर मनमोहन यांनी एक निवेदन जारी केले. त्यात त्यांनी देशातील सरकारच्या व्यवस्थेत कुठलाच निर्णय केवळ एक व्यक्ती घेऊ शकत नाही. सर्व निर्णय सामूहिक स्वरूपाचे असतात, याकडे लक्ष वेधले.
आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांना अटक करण्यात आली. आयएनएक्स मीडियाला परदेशातून निधी मिळवण्यासाठी चिदंबरम अर्थमंत्री असताना परकी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मंजुरी दिली. त्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणाचा संदर्भ देऊन मनमोहन यांनी पुढे म्हटले की, डझनभर सरकारी अधिकाऱ्यांनी छाननी करून त्या प्रस्तावाची शिफारस केली. मंत्री या नात्याने चिदंबरम यांनी एकमताने आलेल्या त्या शिफारसीला मंजुरी दिली.
अधिकाऱ्यांनी चूक केलेली नसेल तर केवळ शिफारस मंजूर करणारा मंत्री आरोपी ठरू शकतो हे आकलनाच्या पलिकडचे आहे. शिफारसीच्या मंजुरीसाठी मंत्र्याला जबाबदार धरले गेल्यास सरकारची संपूर्ण व्यवस्थाच कोसळेल, अशी भीतीही मनमोहन यांनी व्यक्त केली.