इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी धार्मिक असमानतेविरोधात वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर ईशनिंदेचा आरोप व्हायला लागला आहे.
पाकिस्तानमधील सत्तारुढ पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष झफरवल तेहसील, कमर रियाझ सुलेहरी यांनी हा आरोप केला आहे. राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून सर्व धर्म समान आहेत, असे वक्तव्य ख्वाजा आसिफ यांनी केल्याबद्दल त्यांच्यावर ईशनिंदेचा आरोप होतो आहे.
गुरुवारी संसदेमध्ये बोलताना ख्वाजा आसिफ यांनी हे वक्तव्य केले होते. राज्यघटनेनुसार सर्व जाती, धर्म आणि पंथ एकसमान आहेत, असे ते म्हणाले होते. इस्लामाबादेत उभारण्यात येणाऱ्या हिंदू मंदिराला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांवर त्यांनी टीका केली.
मंदिराला विरोध करणाऱ्या गटांनी पाकिस्तानचे संस्थापक महंम्मद अली जिना यांना “काफिर ए आजम’ असे संबोधले होते. राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून कोणताही धर्म एकापेक्षा अधिक वरचढ नाही. लोकप्रतिनिधी म्हणून समाजामधील सौहार्द आणि सहिष्णूतेला प्रोत्साहन देणे हेच खासदारांचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले होते.
मात्र त्यांच्या या वक्तव्यावर देशातील कट्टरवादी गट भडकले असून सरकारने आसिफ यांच्याविरोधात ईशनिंदेचा खटला दाखल करावा, अशी मागणी व्हायला लागली. अल्पावधीतच पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाज गटाचे अध्यक्ष शाहबाझ शरीफ यांनी निवेदन जाहीर करून आसिफ यांच्या वक्तव्याचे समर्थनच केले. आसिफ यांचे वक्तव्य राज्यघटना आणि इस्लामला अनुसरूनच आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.