भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने शनिवारी अचानक सोशल माध्यमावर व्यक्त होत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती घोषित केली. क्रिकेटच्या मैदानावर “कॅप्टन कूल’ आणि “ग्रेट फिनिशर’ क्रिकेटपटू म्हणून ओळखल्या गेलेल्या धोनीने आपली निवृत्ती ही कोणताही गाजावाजा न करता “कूल’पणेच जाहीर केली.
भारतीय क्रिकेट संघात सत्तर-ऐंशी वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी जागतिक पातळीवर नाव कमावले आहे. भारतीय क्रिकेट या क्रिकेटपटूंच्या नावामुळेच ओळखले जाते. या क्रिकेटपटूंच्या ओळीमध्ये निश्चितच धोनीच्या नावाचा समावेश होतो. 2000 सालानंतर सुरू झालेल्या आधुनिक प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा निर्माण करण्यात धोनीचा सिंहाचा वाटा होता, हे मान्यच करावे लागेल. अजित वाडेकर, सुनील गावस्कर, कपिलदेव, सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, राहुल द्रविड या दिग्गज क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेटचा दबदबा वाढवला होता. हा दबदबा सर्वोच्च पातळीवर नेण्याचे काम धोनीने केले. वरील नाव घेतलेल्या महान क्रिकेटपटूंपैकी गावस्कर, तेंडुलकर अथवा द्रविड हे महान खेळाडू कर्णधार म्हणून यशस्वी होऊ शकले नव्हते. मात्र कपिल देव नंतर सौरभ गांगुली आणि नंतर धोनी यांनी मात्र यशस्वी कर्णधाराची पताका फडकत ठेवली होती.
1983चा क्रिकेट विश्वचषक जिंकून कपिल देवने भारतीय क्रिकेट संघाला जिंकण्याची सवय लावली होती. त्यानंतर सौरभ गांगुलीने आक्रमक क्रिकेटचे प्रदर्शन करत भारतीय क्रिकेटला सतत स्पर्धात्मक वातावरणात ठेवले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेटची कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या धोनीने विजय मालिकेतील सातत्य कायम ठेवण्याचे महत्त्वाचे काम केले. मैदानावर कोणताही आक्रस्ताळेपणा, आक्रमकपणा, वादग्रस्तपणा न दाखवता अत्यंत थंडपणे डावपेच आखणारा धोनी “कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जाऊ लागला. आयसीसीने पुरस्कृत केलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धा, एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा या तीनही स्पर्धांमध्ये आपल्या देशाला विजेतेपद मिळवून देणारा जगातील एकमेव कर्णधार म्हणून धोनीच्या नावाची नोंद झाली आहे. 1983 नंतर एक क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी भारताला दीर्घकाळ वाट पाहावी लागली होती.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने 2011 मध्ये हा पराक्रम करून दाखवला होता. त्यापूर्वी 2007 मध्ये टी-20 क्रिकेटचा पहिला विश्वचषक जिंकून धोनीने आपल्या खेळाची आणि नेतृत्वाची चुणूक साऱ्या जगाला दाखवून दिली होती. 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरून पुन्हा भारतीय संघाला अजिंक्य बनवले होते. मुख्य म्हणजे या महत्त्वाच्या स्पर्धा असो किंवा दोन देशांमधील नियमित क्रिकेट असो, एक कर्णधार म्हणून नव्हे तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणूनही धोनीची कामगिरी लक्षणीय आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा आणि कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा पराक्रम महेंद्रसिंग धोनीसारखा यष्टिरक्षक फलंदाज आणि कर्णधार करू शकतो. टी-20 सारखे आधुनिक क्रिकेटही त्याच्यासारखे अन्य कोणत्या कर्णधार क्रिकेटपटूला समजले असेल असे वाटत नाही. त्याने अनेक सामने भारताला हरता हरता जिंकून दिले आहेत. पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळायला येणाऱ्या धोनीला म्हणूनच “ग्रेट फिनिशर’ असे विशेषण वापरले जाते.
अर्थात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही धोनी आयपीएलसारख्या स्पर्धांमधून आपले कौशल्य दाखवणार असला तरी त्याच्या निवृत्तीचा योग्य उपयोग करून घेण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने करायला हवा. सध्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली नियामक मंडळाचा अध्यक्ष आहे, तर आणखीन एक महान फलंदाज राहुल द्रविड क्रिकेट अकॅडमीचा अध्यक्ष आहे. या क्रिकेटपटूंच्या अनुभवाचा फायदा भारतीय क्रिकेटला होताना दिसत आहे. तसाच फायदा धोनीच्या अनुभवाचा व्हावा, यासाठी नजीकच्या काळात त्याच्यावर एखादी मोठी जबाबदारी देण्यास काहीच हरकत नाही. मागील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतरच धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली असली तरी धोनीने काही काळ वाट पाहून हा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेटमध्ये ऋषभ पंत, वृद्धिमान सहा, संजू सॅमसन यासारखे तरुण आणि गुणवान यष्टिरक्षक फलंदाज उदयाला येत असल्याने आपण त्यांना संधी द्यायला हवी, हाच विचार धोनीने केला. कसोटी क्रिकेटमधून पूर्वीच निवृत्ती जाहीर केलेल्या धोनीने कोणत्याच प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे नाही, हा निर्णय योग्य वेळी जाहीर केला असेच म्हणावे लागेल.
आपल्या कूल स्टाइलमध्ये हा निर्णय जाहीर करताना इंस्टाग्रामवर त्याने “मै पल दो पल का शायर हूँ’, हे गाणे पोस्ट केले, पण भारतीय क्रिकेट शौकिनांच्या मनात या कूल आणि ग्रेट फिनिशर क्रिकेटपटूची प्रतिमा “पल दो पल’ नाही तर दीर्घकाळ राहील, यात शंका नाही. सौरव गांगुली यांच्या शब्दात सांगायचे झाले तर धोनीच्या निवृत्तीमुळे एका युगाचा अंत झाला आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने भारतीय लष्करात काही काळ सेवा बजावून आपल्यातील देशप्रेमाची आणि कर्तव्याची भावना ही साऱ्या जगाला दाखवून दिली होती. हे काम करताना त्याने कोणताही अभिनिवेश किंवा विशेष भाव दाखवला नव्हता. अतिशय सहजपणे ही जबाबदारी पार पाडली होती. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मागणी केल्याप्रमाणे धोनीच्या सन्मानार्थ एखादा अंतिम सामना क्रिकेट मंडळाने आयोजित करायला हवा. धोनीने आपल्या स्वभावाप्रमाणे आणि शैलीप्रमाणे जरी अतिशय शांतपणे क्रिकेटचा निरोप घेतला असला तरी भारतीय क्रिकेटने या महान क्रिकेटपटूचा सन्मान करण्यासाठी एखादा सामना ठेवण्यास काहीच हरकत नाही.
आपल्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कोणताही वाद, भांडण यामध्ये न अडकलेल्या धोनीच्या कूल कारकिर्दीचा सन्मान करण्याची संधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोडता कामा नये. आयपीएल स्पर्धेमध्ये धोनीची कूल कामगिरी यापुढेही काही दिवस दिसणार असली तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र धोनीची उणीव भारतीय क्रिकेट संघाला आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना निश्चितच जाणवणार आहे. 2000 नंतरच्या क्रिकेट जगात भारतीय क्रिकेट संघाला नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या या महान क्रिकेटपटूच्या कारकिर्दीला सलाम.