सागर भोगावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
वीज बिलांचे समायोजनही आवश्यक
सातारा (प्रतिनिधी) – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग, व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर या काळातील 200 युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करुन आलेल्या वीज बिलांचे समायोजन करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे खजिनदार सागर भोगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करोना विषाणूच्या संकटात लॉकडाऊनमुळे सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. उद्योग, व्यवसाय बंद राहिल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीकडून ग्राहकांना भरमसाठ बिले आली आहेत. एकीकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा याचा प्रश्न निर्माण झालेला असताना आता वाढीव वीज बिलांमुळे नागरिकांच्या डोकेदुखीत भर पडली आहे.
राज्य सरकारने याबाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. लॉकडाऊन काळात प्रति महिना 200 युनिटचे वीज बिल माफ करावे, एप्रिलपासून करण्यात आलेली वीज दरवाढ मागे घ्यावी. जुन्याच दराने वीज बीले देण्यात यावीत, राज्य सरकारचा 167 चा अधिभार रद्द करावा आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. या निवेदनावर सागर भोगावकर, ऍड. इम्तियाज बागवान, चांदगणी आतार, महेंद्र बाचल आदींच्या सह्या आहेत.