– हेमंत देसाई
8 जुलै रोजी वायएस शर्मिला कॉंग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी असलेल्या शर्मिला यांचा कॉंग्रेस प्रवेशाबाबत काही प्रश्न निर्माण होतात.
पाटण्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू पक्षाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांच्या पुढाकाराने देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक नुकतीच पार पडली. ज्यावेळी केंद्रात कॉंग्रेसची सत्ता होती, तेव्हा गैरकॉंग्रेसवादाचे राजकारण सुरू होते. त्यानंतरच्या टप्प्यात कॉंग्रेसने बाहेरून पाठिंबा दिलेली अल्पमतातील चंद्रशेखर, देवेगौडा व गुजराल सरकारे अस्तित्वात आली. आज केंद्रात भाजपला उत्तम बहुमत असून, विरोधी पक्ष अत्यंत कमजोर आहेत. कॉंग्रेसची स्थिती ही एखाद्या प्रादेशिक पक्षासारखीच झाली आहे! अशावेळी “हम सब एक है’चा नारा देणे क्रमप्राप्त आहे; परंतु कर्नाटकमध्ये कॉंग्रेसला पूर्ण बहुमत मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत उत्तम यश मिळेल, असे कॉंग्रेसला वाटत आहे.
मात्र देशात काही राज्ये अशी आहेत की, तेथे जे पक्ष सत्तेवर आहेत, ते नरेंद्र मोदी सरकारबाबत संदिग्ध भूमिका घेतात किंवा त्यांना सोयीस्कर तेव्हा पाठिंबा देऊन, आपली राज्यातली वाटचाल निर्धोक बनेल, असे पाहतात. ओडिशातील बिजू जनता दल पक्षाची राजवट त्याच प्रकारची आहे. मोदी सरकारच्या वादग्रस्त विधेयकांना त्यांनी वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. तेलंगणामधील के. चंद्रशेखर राव यांचे बीआरएस सरकार यापूर्वी मोदी सरकारला पाठिंबा देत आले आहे. मग त्यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली आणि आता मात्र पुन्हा एकदा विरोधी पक्षांची मते कापण्याची व्यूहरचना त्यांनी निश्चित केली आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे! आंध्रमध्ये वायएसआर कॉंग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. जगनमोहन यांनीदेखील भाजपबद्दल मवाळ भूमिका घेतलेली आहे.
जगनमोहन यांची धाकटी बहीण वायएस शर्मिला यांनी दोन वर्षांपूर्वी वायएसआर तेलंगणा पार्टी (वायएसआरटीपी) स्थापन केली आहे.
आठ जुलै हा या पक्षाच्या स्थापनेचा दिवस आहे. बहुधा त्याच वेळी शर्मिला यांचा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होईल, अशी बातमी आहे. आंध्रचे विभाजन होऊन आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही दोन राज्ये निर्माण झाली. ज्यावेळी विभाजन झाले नव्हते, त्यावेळी एकसंध आंध्रचे मुख्यमंत्री कॉंग्रेस नेते वायएस राजशेखर रेड्डी हे होते. जगन व शर्मिला यांचे ते पिता. आठ जुलै हा त्यांचा जन्मदिवस. त्यामुळे त्या मुहुर्तावरच आपल्या पित्याच्या मूळ पक्षात जाण्याचे शर्मिला यांनी ठरवले आहे. शर्मिला यांनी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी या संदर्भात चर्चा देखील केली आहे. त्यांच्या आगमनामुळे आणि त्यांचा पक्ष विलीन झाल्यानंतर आंध्रमधील कॉंग्रेसची ताकद किंचित वाढेल, यात शंका नाही. मात्र, यात एक अडचण आहे ती अशी की, शर्मिला यांना तेलंगणामध्ये काम करण्यात अधिक रस आहे. तर कॉंग्रेस श्रेष्ठींना वाटते की, त्यांनी आंध्रमध्ये सक्रिय राहावे. याचे कारण, मुख्यमंत्री जगनमोहन यांना आव्हान देण्याच्या दृष्टीने त्यांचा अधिक उपयोग होईल; परंतु शर्मिला यांनी तेलंगणाची 3,800 किलोमीटरची पदयात्रा केली आहे. यापुढील काळातही त्या तेलंगणावरच भर देणार आहेत.
मात्र, स्वतंत्र पक्ष चालवणे हे व्यवहार्य नाही. शिवाय लोकांचा हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. तेलंगणामध्ये जेवढी राजकीय पोकळी आहे असे आम्हाला वाटत होते, तेवढी ती नाही. शिवाय पक्षाकडे पुरेसे आर्थिक बळ नसल्यामुळे, पक्ष चालवणे मुश्कील आहे. आतापर्यंत पक्षासाठी शर्मिला यांनी आपली काही मालमत्ता गहाण ठेवली होती, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते कोंडला राघव रेड्डी यांनी दिली आहे. मात्र, वायएसआरटीपीचे कॉंग्रेसमधील विलीनीकरण हे विनाशर्त असणार आहे. या पक्षाच्या नेत्यांना कॉंग्रेसमध्ये कोणती जबाबदारी दिली जाणार आहे, हे स्पष्ट नाही. तसेच तेलंगणामधील कॉंग्रेसच्या नेत्यांना शर्मिला यांचे पक्षात येणे कितपत रुचेल हाही प्रश्न आहे. मात्र, शर्मिला या आंध्रच्या राजकारणात प्रवेश करणार नाहीत, तशी शक्यताच नाही, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.
जगनमोहन रेड्डी यांनी 2011 साली वायएसआर कॉंग्रेसची स्थापना केली. ते कॉंग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राज्यव्यापी प्रचारयात्रा काढून प्रचंड लोकप्रियता साध्य केली. वास्तविक त्यांच्यासारख्या नेत्याची कोंडी करून कॉंग्रेसने काय मिळवले, हे कळायला मार्ग नाही. मुळात 2011 ते 2014 हा कॉंग्रेसच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल काळ होता. भ्रष्टाचाराचे सातत्याने होणारे आरोप, अण्णा हजारे यांचे आंदोलन, भाजपने संसदेत घातलेला धिंगाणा यामुळे मनमोहन सिंग सरकार अडचणीत आले होते. अशावेळी आंध्रचे विभाजन करून स्वतःच्या पायावर कॉंग्रेसने धोंडा पाडून घेतला. आंध्रचे विभाजन करण्याची राजकीयदृष्ट्या ती योग्य वेळ नव्हती. शर्मिला यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला आणि तिथेच त्या वाढल्या. हैदराबाद शहर हेच माझे घर आहे.
तसेच तेथेच माझे शिक्षण झाले, विवाह झाला. माझ्या मुलांचा जन्मही तेथेच झाला. त्यामुळे तीच माझी कर्मभूमी आहे, अशी त्यांची भावना आहे. हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे. तेलंगणामध्ये स्वतंत्र पक्ष स्थापन करणे, सरकारी यंत्रणेला तोंड देणे, पोलिसांचा त्रास सहन करणे या सर्व अनुभवातून वायएसआरटीपी हा पक्ष गेला आहे. पक्षाची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली नसल्यामुळे, जिल्हा समन्वयकांमार्फतच हा पक्ष चालवला जातो. आता हा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन झाला, तरीदेखील शर्मिला यांना तेलंगणा कॉंग्रेसचे मुख्य नेतृत्व दिले जाणे शक्य नाही. त्यांना आम्ही आंध्र प्रदेशच्या मानतो आणि म्हणून त्यांच्याकडे नेतृत्व सोपवले, तर आमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचेल, असे मत तेलंगणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयवंत रेड्डी यांनी व्यक्त केले आहे.
आंध्र प्रदेशचा विचार केला, तर तेथे वायएसआर कॉंग्रेसप्रमाणे तेलुगू देसम पक्ष, जनसेना पक्ष, भाजप आणि कॉंग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. तेथे आपल्याला फारसा वाव मिळणार नाही, असा विचार करूनच शर्मिला यांनी तेलंगणाच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली. 20 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांनी प्रजाप्रस्थानम यात्रा सुरू केली आणि 33 जिल्ह्यांचा दौरा केला. त्यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केल्यामुळे बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी शर्मिलांच्या पदयात्रेमध्ये ठिकठिकाणी अडथळे आणले, हल्ले केले. तरीदेखील शर्मिला या बधल्या नाहीत. ते काहीही असो, शर्मिला या राजकारणात मनापासून रस घेत असून, कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे, असे दिसते. कुठल्याही पक्षात बाहेरून एखादी व्यक्ती आली, की त्या पक्षातल्या ढुढ्ढाचार्यांना ते आवडत नाही. कारण मग स्पर्धा निर्माण होते. परंतु कॉंग्रेसला सक्षम करायचचे असेल, तर शर्मिला यांच्यासारख्या तरुण आणि कष्टाळू नेत्यांना अधिक वाव देणे आवश्यकच आहे.