नवी दिल्ली – जगभरातील कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला. कतार हा जगाच्या पाठीवरील एक महत्वाचा तेल उत्पादक देश असून भारतीय मजूर रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात कतारला स्थलांतर करत असतात. कोरोना विषाणूच्या संकटामध्ये कतारमधील भारतीय मजुरांच्या सुरक्षिततेविषयी खातरजमा करण्यासाठी जयशंकर यांनी आज शेख मोहम्मद बिन अब्दुर्रहमान अल-थानी यांच्याशी फोनवर चर्चा केली.
यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत-कतार देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत व कोरोना संकटाचा एकत्रित सामना करण्याबाबत देखील चर्चा केली. भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोरोना संकटाच्या काळात कतारमधील भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबाबत कतारचे विशेष आभार मानले.