इस्लामाबाद – भारताने जम्मू आणि काश्मीरला असलेला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानातील कलम 370 च्या काही तरतुदी हटविण्याची आणि जम्मू काश्मीर आणि लडाखला दोन वेगळ्या केंद्रशासित प्रदेशात विभागण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारच्या या निर्णयावर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरैशींनी जळजळीत प्रतिक्रिया दिली असून भारत नवी दिल्लीत खूप खतरनाक खेळ खेळतोय, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
काश्मीरमध्ये सुरू असलेल्या घडामोडीमुळे पूर्वीच त्रस्त असलेल्या पाकने भारत सरकारच्या या निर्णयावर जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यात ते हादरले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावेळी शाह मोहम्मद कुरैशी म्हणाले की, याचा परिणाम संपूर्ण भागावर होणार आहे, तो भयानक असणार आहे. इमरान खान यांची प्रशंसा करताना कुरैशीनी भारताच्या या निर्णयामुळे काश्मीर मुद्दा आणखी किचकट बनविण्याचा आरोप लावला आहे. त्यांनी म्हटले की, इमरान खान या सर्व प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील होते. पण भारताच्या या निर्णयामुळे हा मुद्दा आणखी किचकट बनला आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्र्यांनी या प्रकरणाला संयुक्त राष्ट्र आणि इस्लामिक देशांच्या मंचावर उठविणार असलल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, काश्मिरी नागरिकांना पहिल्यापेक्षा अधिक कैद केले जात आहे. आम्ही या प्रकरणी संयुक्त राष्ट्राला पूर्वीच सूचित केले आहे. आम्ही हा मुद्दा पुन्हा वैश्विक मंचावर उठविणार आहोत. आम्ही इस्लामिक देशांनाही या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनी पुन्हा म्हटले की पाकिस्तानन काश्मिरी जनतेच्या आत्मनिर्णय अधिकाराचे समर्थन करत आहे. या संघर्षात आम्ही काश्मिरी जनतेसोबत आहोत. दुसरीकडे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे अध्यक्ष आणि विरोधीपक्ष नेते शाहबाज शरीफ यांनी या मुद्याला संयुक्त राष्ट्रात उठविण्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानच्या संसदेचे आज संयुक्त अधिवेशन
भारताने कलम 370 च्या काही तरतुदी हटवल्याने हदरलेल्या पाकिस्तानने मंगळवारी सकाळी 11 वाजता संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावले असून या अधिवेशनात भारताच्या या निर्णयाला कशा प्रकारे विरोध करता येइल याची चाचपणी करण्यात येणार असल्याचे बोलले जात असून सदर प्रकरणी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा सैन्य दलाची बैठक घेऊन सिमेवरील परिस्थितीची चाचपणी देखील करणार असल्याची माहिती पाकिस्तानमधील प्रसिद्धी माध्यमांनी दिली आहे.