नवी दिल्ली – जागतिक पातळीवर शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने त्याचा संसर्ग भारतीय शेअर बाजारालाही झाला. त्यातच जम्मू काश्मीर संदर्भातील 370 कलम रद्द झाल्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक कोसळून 5 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 418 अंकांनी कोसळून 36,699 अंकांवर बंद झाला. त्या आगोदर हा निर्देशांक 700 अंकांनी कोसळला होता. मुंबई शेअर बाजाराप्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा शेअर निर्देशांक निफ्टी 134 अंकांनी कोसळून 10,862 अंकांवर बंद झाला. या निर्देशांकाशी संबंधित 50 पैकी 38 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
माहिती तंत्रज्ञान, उर्जा, धातू, बॅंक, वाहन, पायाभूत सुविधा, औषधे या क्षेत्राबरोबरच स्मॉल कॅप आणि मिड कॅप सोमवारी कोसळले. केंद्र सरकारने काश्मीर संदर्भातील 370 कलम रद्द करून या राज्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव संसदेत मांडला आहे. याचे देशातील अर्थकारणावर आणि राजकारणावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, असे वाटल्याने कुंपणावर बसलेल्या गुंतवणूकदारांनी विक्री करून अंग काढून घेतल्याचे जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे गुंतवणूक अधिकारी विनोद नायर यांनी सांगितले.
व्यापार युद्ध त्याचबरोबर अनेक देशांबरोबर निर्माण झालेल्या तणावामुळे जागतिक चलनबाजारात गोंधळाचे वातावण निर्माण झाल्यामुळे रुपयाचे मूल्य 90 पैशांनीकोसळले. त्याचा परिणाम माहती तंत्रज्ञान कंपन्यांसह निर्यात करणाऱ्या इतर कंपन्यांवर झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूम्वर आणखी 10 टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले.