म्हसवड -लॉकडाऊनमुळे म्हसवड मध्ये अडकलेल्या परप्रांतीयांना म्हसवडमधून एसटी बसने सातारा येथील रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यात आले. साताऱ्यातून रेल्वेने ही परप्रातीय आपल्या मुळ गावी जाणार आहेत. करोनाचा प्रादुर्भात रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कामानिमित्त महाराष्ट्रात विविध ठिकाणी असणारे परप्रातीय मजूर अडकून पडले होते.
हाताला काम नसल्याने अनेक मजुरांना उपासमारीची वेळ आली होती तर रेल्वेसह सर्वच प्रवासी सेवा बंद असल्याने या परप्रांतीयांना आपल्या मुळ गावीदेखील जाता येत नव्हते. मात्र त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मजुरांनी रेल्वेसेवा सुरु केल्याने राज्यात विविध ठिकाणी अडकलेले मजुर आता आपापल्या गावी निघाले आहेत. म्हसवडसह परिसरातही अनेक परप्रांतीय मजुर लॉकडाऊनमुळे अडकले होते. या मजुरांना नुकतेच एसटीमधून सातारा येथे रेल्वेस्थानकापर्यंत सोडण्यात आले.
दहिवडी आगाराच्या तीन बसमधून साठ प्रवासी विभागून मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यात आले.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये म्हसवड परिसरातील शासन प्रतिनिधी, संस्था व दानशूर व्यक्तींनी आम्हाला महत्त्वपूर्ण सहकार्य केले तसेच खाण्यापिण्याची चांगली सोय केली. त्याबरोबरच आम्हाला गावापर्यंत मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे तसेच स्थानिक प्रशासनाचे, दानशूर व्यक्तींचे आभारी असल्याची भावना या परप्रांतीय मजुरांनी व्यक्त केल्या.
म्हसवड येथे परप्रांतीय मजुरांना निरोप देताना नायब तहसीलदार हिरवे, राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते प्रा. विश्वंभर बाबर, राष्ट्रवादी जिल्हा महिला कार्याध्यक्ष कविता म्हेत्रे, नगरसेवक धनाजी माने, म्हसवड तलाठी आखडमल, म्हसवड आगार प्रमुख कोळी, कांता ढाले तसेच पोलीस प्रतिनिधी उपस्थित होते.
म्हसवड शहर व परिसरातील परप्रांतीय नागरीक गेल्या तीन दिवसापूर्वी रेल्वेच्या तांत्रिक अडचणीमुळे म्हसवड येथे माघारी आले होते. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या परप्रांतीयांचा त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग आज मोकळा झाला असून आज सकाळी 71 परप्रांतीय नागरिकांना सकाळचा चहा व नाष्टा कॉंग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी देवून त्यांना निरोप दिला.