मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन लागू झाल्याने परराज्यातील मजूर आणि कामगार त्यांच्या मूळगावी परत गेले. त्यातच प्रशासनाने औद्योगिक संस्था सुरू करण्यास परवानगी दिली असून, सातारा एमआयडीसीतील उद्योग सुरू झाले आहेत. त्यात परप्रांतीय कामगारांच्या जाण्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. तरी, स्थानिकांनी या संधीचे सोने करून घ्यावे. म्हणजेच विविध कंपन्यांमध्ये आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळवावी आणि बेरोजगारीला आळा घालावा, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.
रोजगार उपलब्ध नाही, नोकरी मिळत नाही, परप्रांतीयांमुळे औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिकांना नोकरी नाही, त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबईवरून अवलंबून राहावे लागते, असे आपण नेहमीच ऐकत असतो, पण आजमितीला वेगळी स्थिती आहे. करोना महामारीमुळे देशभरात टाळेबंदी लागू आहे. त्यात जनजीवन विस्कळले असून, जो तो आपापल्या राज्यात, घरी परत जात आहे.
साताऱ्यातूनही हजारो परप्रांतीय त्यांच्या राज्यात परतले आहेत. त्यामुळे सातारा एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये टर्नर, फिटर, हेल्पर, मशिन ऑपरेटर, गवंडी, सुतार अशा अनेक पदांच्या असंख्य जागा रिक्त आहेत. विविध वाहतूक संस्थांमध्ये वाहनचालकांची असंख्य पदे रिकामी आहेत. करोनासारखी महाभयंकर साथ ही वाईट आहेच, पण यामुळे का होईना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. ही चालून आलेल्या संधीचा स्थानिक भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.