वाई -धोम धरणापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अभेपुरी गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. आधीच लोक करोनाच्या भीतीने धास्तावले आहेत, त्यातच दूषित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरवणीवर आला असल्याचा आरोप गावातीलच ग्रामस्थ सुरेश दीक्षित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. दरम्यान, सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या भैरवनाथ मंदिराशेजारील हौदातून होत असलेला पाणीपुरवठा हा पुरेसा नसून दोन्ही हौद बंदिस्त नसल्याने दूषित पाणी पुरवठा होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गावाच्या सार्वजनिक हौदात गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत पाणी सोडून तेथून घरोघरी पाणी पुरवठा केला जातो. ज्या भागाने स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून धोम धरणाच्या उभारणीला जमिनी दिल्या, तसेच गावाच्या उशाला धोम धरण असूनही गावाला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गावाला टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचा आरोपही दीक्षित यांनी केला आहे. तरी ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता त्वरित हौदाची स्वच्छता करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईलण असा इशारा दीक्षित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
स्वच्छतेविषयीचे आरोप बिनबुडाचे
मंदिरालगतचे दोन्ही हौद स्वच्छ करून घेतले आहेत. या हौदामध्ये जोग यांच्या खाजगी विहिरीतून पाणी सोडले जाते. उन्हाळ्यात पाण्याची मागणी जास्त असल्यामुळे व लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून माझ्या स्वतःच्या विहिरीतून जोग यांच्या विहिरीत पाणी सोडले जाते व तेथून पाणी गावाच्या हौदात सोडले जाते. तसेच सार्वजनिक हौद अतिशय स्वच्छ ठेवून वेळोवेळी औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जाते. आरोग्यास योग्य असे पाणी नागरिकांना पुरविले जाते, हौदात स्वच्छता केली नसल्याचे खोटे आरोप दीक्षित करत असून त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत.