पाबळ – करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, तब्बल महिनाभर काम मिळेना, शेवटी पुण्या-मुंबईच्या करोना रुग्णांच्या संख्येतील वाढीच्या बातम्या ऐकून निराश झालेले हातावर पोट असणारे मजूर आपल्या गावाकडे परतु लागले असल्याचे चित्र पुढे येत आहे.
दरम्यान चारशे ते पाचशे किलोमीटर पायी जायचे पण गावाला जायचेच या भावनेने मुलाबाळांसह निघालेले चाळीस किलोमीटर अंतर चालत आलेले मजूर पाबळ येथे शेतात विसावले, त्याची माहिती मिळताच पाबळ येथील बलुतेदार क्रांती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन, आस्थेने विचारपूस केली तेव्हा ते उपाशी असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर तासाभरात गरम भात व गोड शिरा तयार केला आणि या मजुरांना जेऊही घातले. यावेळी माजी सरपंच सोपान जाधव, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर वारघडे, करण रायकर, अविनाश चौधरी यांनी प्रवासात खाण्यासाठी भाजी भाकरी, काही बिस्किटे दिली.