हिंदी सिनेसृष्टीतील सत्तरच्या दशकातील एक ख्यातनाम पार्श्वगायिका शारदा हिचे नुकतेच निधन झाले. सिनेसृष्टीच्या सत्तरच्या दशकातील सुवर्णयुगाची कातरवेळ होती. ती बातमी वाचल्याबरोबर मन आपसूक त्या काळात ओढले गेले. अन् कानाभोवती रुंजी घालू लागले 1966 मधील सुपरडुपर हिट “सूरज’ चित्रपटातील पार्श्वगायिका शारदाने गायलेले त्या वर्षीचे तुफान गाजलेले वेगवान चालीचे गाणे- “तितली उडी, उडे जो चली, फूलने कहा, “आजा मेरे पास…’ तितली कहे, “मैं चली आकाश…’
पार्श्वगायिका शारदाने हिंदी सिनेसंगीतसृष्टीत पर्दापणातच गायलेले “तितली उडी…’ हे गाणे तिला टॉपच्या पार्श्वगायकांमध्ये घेऊन गेले. अय्यंगार घराण्यातील ब्राह्मणी संस्कारात वाढलेल्या शारदाला सर्वप्रथम शोमॅन राज कपूरने तो संगीतकार शंकर जयकिशनसमवेत तेहरानला गेला असता एका संगीताच्या कार्यक्रमात ऐकले. तिच्या आवाजाने प्रभावित झालेल्या राजकपूरने तिची संगीतकार शंकर यांच्याकडे शिफारस केली.
संगीतकार शंकर यांनी जणू तिचे पालकत्व घ्यावे तसे तिचे गॉडफादर बनून ते अखेरपर्यंत तिच्या पाठीशी उभे राहिले. आपला सहकारी जयकिशनच नव्हे तर एकूणच फिल्म इंडस्ट्रीतील तमाम संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक आदी मंडळीचे तिच्या आवाजाबद्दल व उच्चारणशैलीबद्दल प्रतिकूल मत असतानाही तिचे हिंदी संगीतसृष्टीत स्थान पक्के करण्यासाठी शंकर यांनी जो एक लढा अखेरपर्यंत दिला तो लढा म्हणजेच शारदाची कारकीर्द असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये. असो.
“सूरज’ चित्रपटातील शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेली तशी सर्वच गाणी तेव्हा लोकप्रिय झाली. इतकी की त्या वर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात याच चित्रपटातील दोन गाण्यांसाठी पार्श्वगायक महंमद रफी आणि शारदा यांच्यात तीव्र स्पर्धा होती. पण अपेक्षेनुसार “बहारो फूल बरसाओ…’साठी त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर झाला.
कारण 1966 पर्यंत सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी महिला व पुरुष असे दोन वेगवेगळे पुरस्कार नव्हते. त्यामुळे शारदाची या पुरस्काराची संधी हातातोंडाशी येऊन निसटली. हे असं प्रथमच घडत होतं. पदार्पणातच चक्क प्रतिष्ठेच्या फिल्मफेअर पुरस्कारापर्यंत मजल मारणे म्हणजे, “तितली कहे मै चली आकाश…’
त्यानंतर फिल्मफेअर पुरस्कारासाठी ती तीन-चार वेळा नॉमिनेट झाली. तुम्हारी भी जय जय (दिवाना), तेरे अंगका रंग है सिंदूरी (चंदा और बिजली), आपके पिछे पड गयी मै (एक नारी एक ब्रह्मचारी), शेवटी 1971 मध्ये “जहॉं प्यार मिले’ चित्रपटातील “बात जरा है आपसकी’ या कॅबेरे गीतासाठी तिला त्या वर्षीची सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून पुरस्कार मिळाला. पार्श्वगायिका शारदाच्या महत्त्वांकाक्षेला हवा द्यायला, पाठीशी साथ द्यायला संगीतकार शंकरजीसारखे हिंदी सिनेसंगीतसृष्टीतील दि ग्रेट संगीतकार… मग काय विचारता…बड्या बॅनरचे आघाडीच्या फिल्मी सिताऱ्यांचे चित्रपट तिला सहज मिळू लागले. ज्यात गुमनाम (शोला बदन ओ मेरे मन पहलू मे आजाओ),
पण नाही… संगीतकार शंकर यांची ही निवड ना जयकिशनजीला मंजूर होती ना अन्य संगीतकार, निर्माते वा दिग्दर्शकांना. तसे या जोडीत संगमनंतर धूसफूशीला (श्रेयावरून… श्रेयवाद) सुरुवात झालेली होतीच. त्या गोष्टीला शारदाच्या एसजे कॅम्पमधील शिरकावाने जणू हवा मिळाली. शंकर यांनी संगीत दिलेले चित्रपट ओळखणे जाणकारांना आता जास्त सुलभ झाले. कारण जयकिशन शारदाच्या आवाजाचा वापर करायच्या विरूद्ध असत.
शारदाच्या पार्श्वगायनात सदोष उच्चारणासह अनेक दोष वा उणिवा असल्याचे तेव्हाचे संगीतकार खासगीत बोलत असत. तरीही संगीतकार रवी, इकबाल कुरेशी, दत्ताराम वा उषा खन्ना सारख्या संगीतकारांनी तिचा आवाज अपवाद स्वरूपात काही वेळा वापरला. तिने या सत्तरच्या दशकात शर्मिला टागोर, हेमा मालिनी, हेलन, रेखा सह अनेक आघाडीच्या नायिकांना ज्याप्रमाणे आपला उसना आवाज दिला तद्वत पार्श्वगायक महंमद रफी, मुकेश, किशोरकुमार, येसूदास सारख्या पार्श्वगायकांबरोबर तिने उत्तमोत्तम युगुल गीतेही गायली. ज्यामध्ये चले जाना जरा ठहरो, दिल का गुलदस्ता बाहो का हार, वो परी कहॉं से लाऊ, हमको तो बरबाद किया तुमने, तुम्हारी भी जय जय, अशा काही लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे.
ज्या राज कपूरने सर्वप्रथम तिचा आवाज हेरला त्याने मात्र तिच्या आवाजाचा वापर “कल आज और कल’ (किसीके दिलको)चा अपवाद वजा केला तर कधीच केला नाही. पॉप म्युझिकचा सिझलर हा आल्बम काढणारी शारदाही त्या काळातील पहिला पार्श्वगायिका होती असे समजतात. त्यानंतर तिचा गाजलेला अल्बम म्हणजे मिर्झा गालिब यांच्या शेरोशायरी व गझलांवर तिने केलेला “अंदाजे बयॉन’ हा अल्बम होय. ज्याचे संगीतही तिनेच दिले होते.
1970च्या काळात तिने “मॉं बहेन और बिबी’ या चित्रपटाला संगीतही दिले होते. त्यानंतर तिने तू मेरी मैं तेरा, क्षितिज, मंदिर-मसजिद, मैला आंचल आदी चित्रपटांसाठी संगीत दिले. यापैकी एका चित्रपटातील गाण्यासाठी महंमद रफी यांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. तिने संगीत दिलेल्या चित्रपटातील गाणी गाजली, लोकप्रिय झाली असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल.
पण पार्श्वगायिका म्हणून तिची जी गाणी सर्वाधिक गाजली तिला संगीतकार शंकर जयकिशनसारख्या सिद्धहस्त संगीतकाराने संगीत दिल्याने गाजली हे कुणीही नाकारू शकत नाही. एरवी अन्य संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली तिची गाजलेली लोकप्रिय झालेली गाणी आठवण्यासाठीसुद्धा डोक्याला ताण द्यावा लागतो. त्यांच्या निधनामुळे त्यांची काही गाणी सहजगत्या आठवतात, हे मात्र खरे.
– दिलीप कुकडे