तरुणांनो, तुम्ही राष्ट्रीय भविष्य आहात. म्हणजेच भविष्यकालीन कृतीशील आणि कर्तृत्ववान नागरिक आहात. कुमार वयाच्या मुला-मुलीचे भावविश्व किती सुंदर असते, नेहमी काहीतरी करावेसे वाटते. अगदी आकाशात उडून चंद्र हाती घेण्यापासून ते समुद्राच्या तळ्यातील शिंपल्यातून मोती आणण्यापर्यंत तुमच्या विचारांची झेप असते. तुमचे सळसळणारे रक्त काहीतरी करायची वाट पाहत असते. मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती तुमच्यातल्या सुप्त गुणांना विकसित करून देण्याची वाट पाहत असते.मनुष्य जीवनातील ना धड बालपण, ना धड प्रौढावस्था, असा हा कुमारवयीन काळ म्हणजेच “टीनेज’. खरोखरच तणाव आणि वादळांचा काळ असतो. याच काळात तुम्हाला पदवी घेऊन आपल्या करिअरचा भक्कम पाया बांधायचा असतो.
कुमारवयीन अवस्थेत जी स्थित्यंतरे होतात, त्यातील महत्त्वाची स्थित्यंतरे म्हणजे विरुद्धलिंगी आकर्षण, चेहऱ्यावर तारुण्यपीटिका येणे ज्यामुळे आत्मविश्वास डगमगतो, उंची वाढणे, आवाजात बदल होणे, मुलींचे लवकर मॉच्युअर होणे इत्यादी. प्रत्येक तरुण तरुणीवर या बदलांचा कमी जास्त स्वरूपाने मानसिक परिणाम होतो. कित्येक तरुण मुले या बदलांमुळे प्रचंड तणावाखाली वावरतात. इतके की ते अबोल होतात,एकाकी होतात. कशातच रस वाटेनासा होतो आणि अनेकदा आत्महत्येचे विचार देखील त्यांच्या मनात डोकावतात. काही तरुण-तरुणी या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या तणावापासून मुक्तता मिळविण्यासाठी दारू-सिगरेटचीही सवय लावून घेतात. पान-मसाला, गुटखा, मादक पदार्थांचे सेवन करतात. कित्येक जण डिस्को- पब संस्कृतीत स्वतःला पूर्णपणे बुडवून घेतात. या काळात, तुम्ही “स्व’ शोधत असता.परंतु मुलींची रस्त्यावर टिंगल करून, त्यांची छेड काढून आणि बाहेर हिंडून- भटकून, हॉटेलमध्ये गप्पा मारून तुम्हाला तुमचा “स्व’ मिळणार नाही.
तुम्ही तरुण आहात, ताज्या दमाचे नागरिक आहात. म्हणून तुमच्यातला उत्साह, जोश चांगल्या कार्यांसाठी खर्च करा. तुम्ही “युवा’ चित्रपट पहिला असेलच. त्यातला महत्त्वाचा मुद्दा काय होता? की तरुणांनी राजकारणात सहभाग घेतला पाहिजे. भ्रष्टाचाराने लथपथ भरलेल्यांना धडा शिकवला पाहिजे. सत्ताधारी लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. कायद्याच्या निर्मितीत भाग घेतला पहिजे. आई-वडिलांनी जी अभ्यासाची संधी दिली आहे, तिचा पुरेपूर फायदा घेऊन,चांगले करिअर करून, देशाचा चांगला नागरिक होणे आवशक आहे. आज आपले राष्ट्र आतंकवाद, भ्रष्टाचार, स्वार्थी, भक्षक, हिंसक टोळ्या, यांच्या दुष्ट चक्रात अडकले आहे. धडाडीच्या तरुणांनी आपापल्या परीने देशांच्या सामाजिक आर्थिक मागासलेपणाचा शोध घेऊन, त्यावर उपाययोजना केली पाहिजे.
कॉलेजचे लेक्चर बंक करून, कॅम्पसमध्ये टोळ्या बनवून मस्ती करण्यापेक्षा, जर समाजोपयोगी कार्यक्रमात सहभाग घेतला तर समाजाचे कल्याण होईल. कुठल्याही गैर-शासकीय संघटनेत, अपंग मुलांच्या शाळेत, अनाथालयांमध्ये, एड्सग्रस्त रोग्यांमध्ये स्वतःला झोकून द्या. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लोकांची सेवा करूनच मिळतील. इथेच तुम्हाला “स्व’ चा शोध लागेल. समजा, असे करणे तुम्हाला जमले नाही तरी निदान आपल्या घरी आपल्या आई-वडिलांची काळजी घ्या. तुमच्या आई-वडिलांनी तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्हाला कचऱ्याचा डब्यात फेकून दिले असते तर तुमचे काय हाल झाले असते? म्हणून आई-वडिलांवर चिडू नका व त्यांचा मान राखा. त्यांच्या आशीर्वादानेच तुम्ही जीवनाच्या यशाची शिखरे गाठणार आहात, हे विसरू नका.
तरुण-तरुणींनो तुमच्यातला दुर्दम्य उत्साह आजीवन कायम राखा. तुमचे कर्तृत्व गाजवून दाखवा. धडाडीने, हिमतीने पुढे जा. जग तुमची वाट पाहत आहे. जगाला तुमची गरज आहे. गरीब शेतकऱ्यांना, शोषित स्त्रियांना, दुःखी कामगारांना, रोग्यांना,बालमजुरांना, निराधार वृद्धांना, शारीरिक मानसिक अपंगाना, तुमची गरज आहे. तुमची तरुणाई या लोकांसाठी खर्च करा आणि पाहा, तुम्हाला खरे सुख आणि समाधान मिळते की नाही. हे सुख समाधान दारू पिण्याने, सिगारेट फुंकल्याने, गुटखा- पानमसाला खाल्ल्याने, बाइकवरचे स्टंट, चित्रपटांची मजा लुटल्याने, म्युझिक ऐकून टाइमपास करण्याने मिळणार नाही. त्यासाठी अनेक त्याग करावे लागतील. परंतु हे सुख समाधान तुम्हाला चिरतरुण राहण्यास मदत करेल. तुमच्या वृद्धावस्थेत जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल, तेव्हा काही तरी आयुष्यात आपण केले आहे, याचे तुम्हाला समाधान मिळेल. मृत्यूच्या वेळी हे समाधान, तुम्हाला मुक्ती मिळवून देण्यास मदत करेल.
सुख समाधान आणि जीवनातील शांती ही घेण्यात नसते तर देण्यात असते. पण जे द्यायचे आहे, त्यातून दुसऱ्यांना जीवन जगण्याची उमेद मिळेल, त्यांना आनंद होईल,असेच दिले पाहिजे. आपल्या देण्यामुळे जर दुसरा परावलंबी होत असेल, तर ते देणे नव्हे. आपल्या देण्याने दुसरा खऱ्या अर्थाने सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे. असे जर झाले, तर मानव समाज नक्कीच सुखी होईल.
प्रा. भगवान गावित