कार्तिक वारी अवघ्या 10 दिवसांवर
आळंदी – तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत आळंदी शहरात सुरू असलेली विकासाची कामे ही 90 टक्के पूर्ण झाली असली तरी, उर्वरित छोटी-छोटी अपूर्ण कामे अवस्थेत असल्याने ती भाविकांसह आळंदीकरांच्या दृष्टीने देखील गैरसोयीची ठरत आहेत.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत येणाऱ्या कामात अपुरे पदपथ, चौका-चौकात दोन्ही जोड रस्त्यांमध्ये लावण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक तेही अपूर्ण अवस्थेत, नवीन बनविलेल्या पदपथावर विद्युत भुयारी केबलसाठी पुन्हा त्याची तोडफोड करण्यात आली असून भर यात्रेत त्याचा भाविकांना मोठा अडथळा ठरणार आहे. तसेच शहराच्या बाहेरील पदपथावर अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी आतापासूनच जागा अडवून विविध व्यवसाय टाकण्यास सुरुवात केली आहे.
नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करून अनधिकृतपणे बांधकामाचा जणू कोणाच्या तरी वरदहस्ताने धुमधडाकाच चालविले आहे, तरी नगरपालिका “मूग गिळून गप्प’ कशी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तरी यात्रा सुरू होण्यापूर्वीच युद्ध पातळीवर ही अतिक्रमणे व राहिलेल्या पदपथावरील अपूर्ण कामे पूर्ण करुन, भाविकांसाठी येत्या कार्तिकी यात्रेत ती खुली करावी, अशी मागणी जोर
धरीत आहे.