सामान्य प्रशासनाचा प्रशासकीय विभागांना आदेश
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे ज्या उमेदवारांची नियुक्ती केली जाते, त्यातील जे उमेदवार रुजू न झाल्यास, त्यांची नियुक्ती रद्द होणार आहे. तसेच, त्या रिक्त पदांवर आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नावे मागविण्याची कार्यवाही पूर्ण करावे, असे आदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व प्रशासकीय विभागांना दिले आहेत. त्यामुळे ज्या पदासाठी प्रतीक्षा यादी ठेवण्यात येत असेल, तर त्या उमेदवारांना प्रतीक्षा यादीचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी रिक्त जागेवर नियुक्ती होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस यादी संबंधित प्रशासकीय विभागास पाठविताना ज्या पदासाठी प्रतीक्षा यादी ठेवण्यात येते, त्याचा वैधता कालावधी किती आहे, त्याची माहिती शिफारस यादीसोबत देणे आवश्यक आहे. प्रशासकीय विभागांनी शिफारस यादी प्राप्त होताच, शिफारस केलेल्या उमेदवारांनी संबंधित पदावर 30 दिवसांच्या आत रूजू होणे आवश्यक आहे. या कालावधीत रूजू होण्यास मुदतवाढ देण्याची विनंती न केल्यास 60 दिवसांमध्ये नियुक्ती रद्द करण्याचे आदेश देण्यात यावे, असेही राज्य शासनाने सूचित केले आहे.