मुंबई – ओबीसी आरक्षणावर 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही हालचाल केली नाही. त्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, असा आरोप शुक्रवारी मंत्री छगन भुजबळ यांनी केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सुप्रीम कोर्टाच्या निकालावर सभागृहात विरोधकांची भूमिका मांडली. त्याला उत्तर देत असताना छगन भुजबळ यांनी राज्य सरकारची भूमिका सविस्तर विशद केली.
भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचा अधिकार कोर्टाने नाकारला नाही. राज्य सरकारने जो डाटा दिलाय त्याची छाननी करू शकत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. राज्य सरकारने 15 दिवसांत कोर्टाने सांगितल्याप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता केली. मात्र, तरीही काही बाबींवर कोर्टाने बोट ठेवले आहे.
15 दिवसांत काही गोष्टी राहिल्या असतील, तर आपण त्याची पूर्तता करून घेऊ, असे छगन भुजबळ यांनी सभागृहाला सांगितले.ओबीसींना आरक्षण मिळावे यासाठी सर्वांचे एकमत झाले आहे. त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन सन्मानाने मार्ग काढू. सर्व पक्ष एकत्र येऊन ओबीसी आरक्षणावर आम्ही एकसंध आहोत, असे देशाला दाखवून देऊ, असे आवाहन देखील भुजबळ यांनी केले. ते पुढे म्हणाले की, 2010 साली सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने इम्पिरिकल डाटा गोळा केला.
2016 साली हा डाटा केंद्र सरकारकडे सुपुर्द करण्यात आला. त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही हालचाल केली नाही. त्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला.
भुजबळ म्हणाले, काही नगरपालिका ओव्हरड्यू झाल्यात. मात्र, एकही झेडपी ओव्हरड्यू झाली नाही. काही गोष्टी राहून गेल्या. त्या मी मान्यही केल्या. टेक्निकल गोष्टी राहून गेल्या. तारीख वगैरे. मी मान्य करतो. सुप्रीम कोर्टाचा आदर करतो. आम्ही सभागृहात एकमेकांवर चिखलफेक करणार नाही, उणीदुणी करणार नाही. आपण ओबीसी आरक्षणासाठी एक आहोत, हे देशाला दाखवून देऊ असेही त्यांनी नमूद केले.