मुझफ्फरनगर – उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपच्या चार स्थानिक नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या जिल्ह्यात वाळू उत्खननासाठी सरकारकडून मंजूर केलेला भाडेपट्टा मिळवण्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शेतकरी लिलू सिंह यांनी आरोप केला आहे की, आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून युसूफपूर चोत्रा गावात त्यांच्या शेतातून वाळू उपसा करण्यासाठी लीज मिळवली.
भाजपचे जिल्हा सचिव दिवाकर कश्यप, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र, भाजपचे विभागीय अध्यक्ष भूपेंद्र सिंह आणि माजी विभागीय अध्यक्ष बीरेंद्र अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी अजून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. आम्ही अधिक तपास करीत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.