“एक हात मदतीचा मोहीम सरू’ : मदत करण्याचे आवाहन
आळंदी- तीर्थक्षेत्र आळंदीत करोनाचे पार्शवभूमीवर विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे आळंदीत अडकलेले कामगार, प्रवासी, बेघर, रोजंदारीचा अभाव, घरी जाता न आलेले कामगार आणि या परिस्थितीत रोजगार नसल्याने खाण्या पिण्याची तसेच निवाऱ्याची सोय नसल्याने इंद्रायणी नदीचे दुतर्फा फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सर्वानाच अन्नदानाची सोय आळंदी नगरपरिषदने केली आहे.
आळंदीत रोजगार बंद झाल्याने सर्वसामान्य कुटुंबातील झोपडीधारकांना अन्नदान करून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी इंद्रायणी नदी घाटावर नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर,माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, सभापती सागर बोरुंदीया, नगरसेविका सुनीता रंधवे, रुख्मिणी कांबळे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, गणेश रहाणे, मंडलाधिकारी चेतन चासकर, गटनेते पांडुरंग वहिले, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आकाश जोशी, कर निरीक्षक रामराव खरात, अधीक्षक किशोर तरकासे, विजय गावडे आदींच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात अन्नदान वाटप करण्यात आले.
लॉकडाउनची परिस्थिती निवळेपर्यंत आळंदीत अन्नदान सेवा सुरू राहणार आहे. यासाठी स्थानिक नागरिक,व्यापारी, दानशूर व्यक्ती, संस्था यांनी आळंदीतील ज्ञानदर्शन धर्मशाळा भैरवनाथ चौक येथे किराणा साहित्य अन्नदानासाठी वस्तुरूपी मदत व सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी केले आहे. आळंदी शहर आणि परिसरात उपाशी पोटी कोणीही राहू नये यासाठी आळंदीत एक हात मदतीचा मोहीम सरू करण्यात आली आहे. या मोहिमेत सर्वानी आपले योगदान देऊन करोना या संकटावर मात करून गोरगरिबांची अन्नदान रूपातून सेवा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी ज्ञान दर्शन धर्मशाळेत संपर्क करावा, तसेच गरजू कुटुंबे किंवा गरजू व्यक्ती कोणाला माहित असल्यास त्यांची नावे कळवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
- घाटावरील लोकांचा सर्व्हे सुरू
आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या नदी घाटावरील लोकांचा सर्व्हे देखील आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी समीर भूमकर व मंडलाधिकारी चेतन चासकर यांचे माध्यमातून सुरु असून गावी जाणाऱ्यांची यादी तयार केली जात असल्याचे कर निरीक्षक रामराव खरात यांनी सांगितले.