थेऊर- करोनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊन कित्येकजण उद्ध्वस्त झालेले आहे. अचानक आलेल्या करोनारुपी संकटामुळे राज्याची आर्थिक घडी बिघडली आहे. व्यवसाय, उद्योग बंद राहिल्याने संकटातून सावरण्यासाठी सरकारला कोट्यवधीचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाला हातभार लागावा, यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने राज्यातील सर्व मंडलाधिकारी, तलाठ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल व पुणे जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष हेमंत नायकवडी यांनी दिली.
हेमंत नायकवडी म्हणाले की, राज्यावरील संकट, त्याची भयानकता, पुढील अनिश्चित परिस्थिती याचा विचार करून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने राज्यातील 12 हजार 636 तलाठी व दोन हजार 106 मंडलाधिकारी, तसेच तलाठी संवर्गातील अव्वल कारकून, नायब तहसीलदारपदी पदोन्नती झालेल्यांचे सर्वांचे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वांनी शासकीय सुट्या घेऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश ज्ञानदेव डुबल यांनी दिले आहेत.