पाथर्डी -सध्याची भीषण चाराटंचाई विचारात घेऊन तारकेश्वर गडांचे महंत शांतीब्रम्ह आदिनाथ महाराजशास्त्री यांनी शेवगाव तालुक्यातील तळणी येथील हरि महाराज घाडगे व पाथर्डी तालुक्यातील चितळीच्या दीपक महाराज काळे यांच्या गोशाळेस टेम्पोभर कडबा कुट्टी व तीन टन ऊस दिला असून करोनामुळे येथे अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी अन्नछत्र चालवित आहेत.
परिसरातील देवस्थाने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून सातत्याने अनेक सामाजिक कामात आघाडीवर असतात. तारखेश्वर गडही कोणत्याही सामाजिक संकटाच्या वेळी आपले योगदान देण्यात पुढे असतो. सध्या करोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांचा रोजगार बंद पडला. त्यामुळे त्यांचे खाण्याचे वांधे झाले.
अशा निराधारांना आधार देण्यासाठी तारकेश्वर गडातर्फे फिजीकल डिस्टन्स पाळत अन्नछत्र चालवून आपले योगदान देत आहेत. तसेच सध्या तीव्र उन्हाळा वाढला आहे. जनावरांच्या चाऱ्याचेही वांधे झाले आहे. अशाही स्थितीत गडावर सव्वासे गायींची गोशाळा आहे. या वृध्द गायींचे संगोपन करणे अशक्य झालेल्यांनी ही मुकी जनावरे गडावर आणून सोडली आहेत.अशा प्रकारे अन्यत्र चालणाऱ्या गोशाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महंतानी दोन टेम्पो कडबा कुट्टी व तीन ऊस दोन गोशाळांना नुकताच दिला आहे.