नांदेड- मंत्रीपदाचा उल्लेख करून काही व्यक्तींनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावे बनावट पत्रे तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर चव्हाण यांनी पोलिसांत केली आहे. एवढेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.
चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना अज्ञात व्यक्तींनी काही शासकीय पत्रे मिळवून त्यातील चव्हाणांची स्वाक्षरी कायम ठेवत मूळ मजकूर मिटवून बनावट लेटरहेड तयार केले. याची कुणकूण असताना चव्हाण यांना आता असे लेटरहेडही मिळाले होते. त्यामुळे त्यांनी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता.
त्यानुसार त्या प्रकरणाची 31 जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे. मात्र, आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने चव्हाण यांनी लेखी तक्रार दाखल केली.
“ज्याअर्थी माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले आहे, त्याअर्थी पुढील काळात अशाच प्रकारे खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता दिसून येते. आगामी काळात अनेक निवडणुका असून, राजकीय प्रतिमाहनन करण्यासाठी व जनतेत गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने हे बनावट दस्तऐवज तयार केले असावेत,’ असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
खासगी व्यक्ती मागावर
मुंबई आणि नांदेडमध्ये आपल्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे. सदरहू व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, असाही गंभीर संशय अशोक चव्हाण यांनी या तक्रारीत व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी कायदेशीरदृष्ट्या योग्य दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे.