कोरेगाव – जिहे-कटापूर योजनेला नाव देण्यापलीकडे विद्यमान लोकप्रतिनिधींनी काहीही केले नाही, सांगलीला पाणी दिल्यासंदर्भातील आपल्याकडे काही पुरावे असतील, तर ते द्यावेत आणि खरोखरच असा काही निर्णय झाल्याचे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांना दिले आहे.
जिहे-कटापूर योजना बंद पाडण्यासाठीच या योजनेचे वर्गीकरण केल्याचा तसेच सांगलीला पाणी देऊन साताऱ्याचे हक्काचे पाणी बाहेर पळवण्यास हातभार लावल्याच्या आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या आरोपांना आमदार शशिकांत शिंदे प्रत्युत्तर दिले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे, की खोटं बोल पण रेटून बोल, याशिवाय दुसरे कामच विद्यमान लोकप्रतिनिधी करू शकत नाहीत. जलसंपदामंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली, त्यावेळी पाणी वाटपासंदर्भात ‘ते’ म्हणत आहेत, असा कोणताही निर्णय झालेला नाही. सुरवातीला त्यांनी आरोप केला, की बारामतीला पाणी दिले. पुन्हा म्हणत आहेत, की सांगलीला पाणी दिले. यासंदर्भात जर काही पुरावे असतील, तर ते त्यांनी द्यावेत आणि खरोखरच असा काही निर्णय झाला असल्याचे सिद्ध करून दाखवावे. रोज एक नवीन खोटं बोलून जनतेची अशी किती दिवस फसवणूक करणार आहात.
माझ्या जलसंपदामंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये वसना, वांगणा प्रकल्प पूर्ण झाले. तसेच उरमोडी, निरा-देवधरसह इतर प्रकल्पांना गती देण्याचाही मी प्रयत्न केला. डिस्कळ, ललगुण परिसरातील गावांना उचलून पाणी मिळवून देण्यासाठी मी फेरसर्वेक्षण करायला लावले. खिरखिंडी, रामोशीवाडी, चिमणगाव परिसराला उचलून पाणी देण्याचा निर्णय देखील त्याच वेळी मी घेतला होता. त्याचबरोबर माण, खटावलाही पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. अलिकडेच आपण मात्र संबंधित अधिकाऱ्यांना दमबाजी करून रामोशीवाडीच्या पाझर तलावामध्ये पाणी सोडू दिले नाही. एवढे आपण संकुचित वृत्तीचे आहात. लोकांना आणि कंत्राटदारांना वेठीस धरू नका. अधिकाऱ्यांना सतत दमबाजी करून विकासकामांना थांबवण्याचे पाप करता आहात. त्यामुळे नारळबाबा कोण आहे, हे जनताच ठरवेल, असे पत्रकात म्हटल आहे.
महेश शिंदे नौटंकीबाज आमदार
ज्यावेळी उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कोयनेचे उर्वरित पाणी विदर्भ मराठवाड्याला देण्याची घोषणा केली, त्यावेळी आपण मूग गिळून गप्प का बसलात? त्यावेळी आपण विरोध का केला नाही? फक्त नौटंकी म्हणून आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्र्यांबरोबर बैठकीचा फार्स करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहात. मी आमदार आणि जलसंपदामंत्री असताना माझ्या कार्यकाळात जिहे-कटापूर योजनेसाठी 194 कोटी 44 लाखांचा निधी खर्च झाला होता. त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये 98 कोटी 21 लाखांचा निधी खर्च झाला. त्यानंतर आपण या योजनेसाठी किती निधी मंजूर करून आणला आणि उपलब्ध करून दिला, त्याचे पुरावे आपण द्यावेत, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकात नमूद केले आहे.