नगर -जिल्ह्यात उद्यापासून नवरात्रौत्सव सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्व मंदिरे खुली करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, करोराची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही करोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे भाविकांनी उत्सवात गर्दी करू नये. नवरात्रौत्सवात भाविकांनी करोना नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षिचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.
देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरीता चार फुट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची दोन फुटांच्या मर्यादेत असावी. मागील वर्षीप्रमाणे शक्यतो देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.
गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे, शिबिरे आयोजित करावी. त्याद्वारे करोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन केले आहे.
विसर्जन मिरवणुका काढू नयेत
आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पांरपारिक पध्दतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे, असे आवाहन करण्यात आले.