Weather Update – नवे वर्ष सुरु हो ऊन जेमतेमाअठच दिवस झालेले असताना ऐन हिवाळ्याच्या मध्यात देशभर पावसाळी हवामान पसरले आहे. अर्ध्या देशाचे वातावरण बिघडले असल्याने माणसांची प्रकृती आणि पिकांवर अनिष्ट परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. दिल्लीत धुके, राजस्थानसह महाराष्ट्रामध्ये पाऊस, उत्तर प्रदेशसह बिहारमध्ये थंडीचा प्रकोप दिसून येत आहे तर काही राज्यांमध्ये उन्हाचा त्रास होत आहे.
मंगळवारी सकाळी राष्ट्रीय राजधानीत किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर शहराच्या काही भागात हलके धुके होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.३० वाजता सापेक्ष आर्द्रता ९७ टक्के नोंदवली गेली. हवामानाशी संबंधित परिस्थितीमुळे दिल्लीकडे येणाऱ्या किंवा शहरातून जाणाऱ्या १६ गाड्या मंगळवारी उशिराने धावत आहेत.
आयएमडीच्या म्हणण्यानुसार, सोमवारी दिल्लीत या महिन्यातील सर्वात थंड दिवस नोंदवला गेला ज्यामध्ये किमान तापमान ५.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. हे या हंगामातील सरासरी तापमानापेक्षा दोन अंश कमी आहे आणि नैनिताल या हिल स्टेशनसारखेच आहे.
तर एका दिवसापूर्वी नैनितालमध्ये किमान तापमान ५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत हिवाळी हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली होती, जी 4.9 अंश सेल्सिअस होती. हे तापमान सरासरीपेक्षा चार अंशांनी कमी होते.
राजस्थान : कडाक्याच्या थंडीत पाऊस
राजस्थानमधील अनेक भागात कडाक्याच्या थंडीतही गेल्या २४ तासांत पाऊस झाला. राज्यातील अनेक भागात दाट धुके आणि थंडीची लाटही कायम आहे. जयपूर हवामान केंद्रानुसार, गेल्या २४ तासात कोटामध्ये २२ मिमी,
लाडपुरामध्ये १४ मिमी आणि बारनमध्ये ८ मिमी पाऊस झाला आहे. शिवाय चित्तोडगड, सवाई माधोपूर, दौसा, करौलीसह अनेक ठिकाणी पाऊस झाला. या काळात राज्यात अनेक ठिकाणी दाट धुके होते. काही ठिकाणी थंडीची लाट नोंदवण्यात आली.
बिहारमध्ये थंडीच्या लाटेचा कहर
बिहारमध्ये थंडीची लाट कायम आहे. या माहितीमुळे हवामान खात्याने थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात थंडीची लाट आणि वाढती थंडी पाहता शाळांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढू शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
उत्तर प्रदेशात पावसासोबतच थंडी
उत्तर प्रदेशात थंडीची लाट कायम आहे. पर्वतांवर झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम आता राज्यातही दिसून येत आहे. घसरत्या तापमानासोबतच धुक्यानेही लोकांना हैराण केले आहे. वाराणसी आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा परिणाम दिसून येत आहे. मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.