राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त आ.जगताप यांनी दैनिक प्रभातशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या मूल्याधिष्ठित राजकारणाचा वसा घेऊन ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब राजकारणात आले. अर्ध्या शतकाहून अधिक काळ त्यांचा दबदबा कायम आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील बहुतेक सर्वच चांगल्या, वाईट घटनांत विरोधकांना नेहमीच पवार साहेबांचा हात आपल्या पाठीवर असल्याचा भास होतो. भल्याभल्यांच्या उरात नेहमीच धडकी भरवणाऱ्या आमच्या या उत्तुंग नेतृत्त्वाने एका उदात्त हेतूने 10 जून 1999 रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली.
80 टक्के समाजकारण आणि अवघे 20 टक्के राजकारण, हे साहेबांचे प्रमुख सूत्र. त्याच सूत्राच्या आधारे पवार साहेबांनी घेतलेले अनेक निर्णय क्रांतिकारी ठरले. ते केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणासाठी परिणामकारक ठरले. त्यात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण देण्याचा निर्णय असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार. सहकारातून समृद्धीचा राजमार्ग प्रशस्त करताना खेड्या-पाड्यांतील जनता सुखी आणि समृद्ध व्हावी, याकडे पवार साहेबांनी आवर्जून लक्ष दिले. मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्रीपदाच्या कार्यकाळात पवार साहेबांनी देशातील कृषिव्यवस्था अधिकाधिक बळकट व्हावी आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी विविध निर्णय घेतले. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने बहुजनांच्या मतांचा आदर करण्यात पवार साहेब नेहमीच अग्रेसर राहिले.
शेतीच्या क्षेत्रात मूलभूत संशोधनांना गती देण्याचे कार्यही साहेबांच्या काळातच प्राधान्याने हाती घेण्यात आले. अन्नप्रक्रिया क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान इतिहासालाही नाकारता येणार नाही. राजकीय मतभेद आहेत. ते असावेतही. मात्र, शरद पवार साहेबांच्या बोटाला धरुन राजकारण शिकलो, अशी प्रांजळ कबुली जेव्हा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोंदीच देतात, तेव्हा मी पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान वाटतो. म्हणूनच त्यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसला अल्पावधीतच जनतेची पसंती मिळाली, हे कोणालाही नाकारता येणार नाही.
आता अवघा देश भाजपला कंटाळला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रात निर्माण झालेल्या नव्या राजकीय पेचातही पवार साहेबांची भूमिका निर्णायक ठरली. ती सर्वांच्या फायद्याचीही झाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. हे फक्त पवार साहेब व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच करू शकतो, हे सर्वांना मान्य करावे लागेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मागील दोन दशकांच्या शासनकाळात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. कृषी, आरोग्य, कुटुंबकल्याण, सामाजिक न्याय, क्रीडा, उद्योग, ग्रामीण आणि शहरी विकास, पायाभूत सुविधांचे जाळे, ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर भारनियमनातून मुक्ती, अशा क्षेत्रात राष्ट्रवादीने घेतलेला पुढाकार अभूतपूर्व ठरला.
ही कामे कौतुकास पात्र आहेत. निसर्गाचे संकट ओढावल्यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पवार साहेबांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. दुष्काळी परिस्थितीत बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने मोठी कर्जमाफी जाहीर केली. त्यातून सामान्य माणूस देखील पवार साहेब आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे अत्यंत आदराने पाहतो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसची मुसंडी कायम आहे. जिल्ह्याच्या राजकारणातही वेगळी ओळख आणि दबदबा कायम राहिला. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारापैकी तब्बल सहा जागांवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले. त्यातही दोन जागांवर अगदीच निसटता पराभव झाला. पक्षाचे हे यश अभिमान वाटावा, असेच आहे.
पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही पक्षाची ध्येय्य धोरणे तळागाळापर्यंत रुजविण्यासाठी परिश्रम घेतले. प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे सध्याच्या करोनाच्या काळातील काम उभ्या महाराष्ट्राने पाहिले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर जिल्ह्यासाठी केलेले नियोजनही महत्वाचे ठरले. धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे शिलेदार पक्षाकडे आहेत, ही पक्षाची जमेचीच बाजू ठरली.
पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक प्रश्न निकाली काढण्यात यश मिळाले आहे. तथापि, भविष्यात नगर जिल्ह्यातील पाण्याचा संघर्ष अटळ दिसतो. साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याची प्राधान्याने सोडवणूक करावी लागेल. जिल्ह्यातील शेतीसाठी सिंचन अपुरे पडतेय. दक्षिण भागात कायम दुष्काळ आहे. त्यात सहा तालुके धरणांच्या पाण्यापासून वंचित आहेत. नगरमधील एमआयडीसीचे विस्तारीकरण लांबले आहे. पांढरीपूल येथील फूड इंडस्ट्रीला उद्योगांची प्रतीक्षा आहे.
नगर शहराच्या बाह्यवळण रस्त्याची दुर्दशा कायम आहे. शहरातून जाणाऱ्या सीना नदीतील अतिक्रमणे, प्रदूषण हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरला. दौंड-मनमाड लोहमार्गाचे रखडलेले विद्युतीकरण व दुहेरीकरण तसेच नगर-पुणे व नगर-मुंबई थेट लोहमार्गाचे काम सुरू व्हावे, अशी नगरकरांनी मागणी आहे. नगरमधील उड्डाणपूल आता गमतीचा विषय ठरतोय. नगर व सुपे एमआयडीसीतील विकासाला चालना मिळायला हवी. गोदावरी खोऱ्यात पश्चिमेकडील पाणी वळविण्याचा प्रस्ताव अजून धूळखात पडून आहे. तेच पाणी गुजरातकडे वळविण्याचा घाट घातला जातोय. तो हाणून पाडावा लागेल.
शब्दांकन :
विठ्ठल लांडगे,(निवासी संपादक)
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसची मुसंडी कायम आहे. जिल्ह्याच्या राजकारणातही वेगळी ओळख आणि दबदबा कायम राहिला. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारापैकी तब्बल सहा जागांवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले. त्यातही दोन जागांवर अगदीच निसटता पराभव झाला. पक्षाचे हे यश अभिमान वाटावा, असेच आहे. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही पक्षाची ध्येय्य धोरणे तळागाळापर्यंत रुजविण्यासाठी परिश्रम घेतले. प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे सध्याच्या करोनाच्या काळातील काम उभ्या महाराष्ट्राने पाहिले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर जिल्ह्यासाठी केलेले नियोजनही महत्त्वाचे ठरले. धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे शिलेदार पक्षाकडे आहेत, ही पक्षाची जमेचीच बाजू ठरली.
आमदार संग्रामभय्या जगताप, विधानसभा सदस्य, नगर शहर.
नगर शहराच्या विकासासाठी अगोदर एमआयडीसीचा विकास होणे अत्यंतिक गरजेचे आहे. त्यातही प्राधान्याने तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल, ते पाहावे लागेल. अलीकडेच “आयटी’ पार्कचा विषय हाती घेतला होता. नगरकरांच्या रोजगार निर्मितीसाठी ती अत्यंत समाधानाची बाब ठरली. शहरातील रस्ते, गटारी आणि पाणी, याही पलीकडे पाहावे लागेल.
महापालिकेची तिजोरी सातत्याने अडचणीत आहे. तिला ऊर्जितावस्था आणण्यासाठी उत्पन्नाचे काहीतरी ठोस पर्याय शोधावे लागतील. नेहरू मार्केट, प्रोफेसर कॉलनी चौक मार्केटची गुंतागुंत आहे. ही व्यापारी संकुले पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न असेल. त्यासह सावेडी, केडगाव, सारसनगर भागातील भुयारी गटर योजना मार्गी लावायची आहे. आत्ताच तपोवन रस्त्यासाठी तब्बल सव्वातीन कोटी रुपयांचा निधी मिळविला. हा रस्ता आता पूर्णत्वाकडे आहे.