नवी दिल्ली – वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून सध्या वातावरण तापलेले आहे. वर्णद्वेषी ही भावना संपुष्टात आणायची असेल तर केवळ कायदे करून चालणार नाही तर, जनमानसाची जनजागृती करावी लागेल तरच हे प्रकार नाहीसे होतील, असे मत भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू इरफान पठाण याने व्यक्त केले आहे.
अमेरिकेतील एका घटनेत जॉर्ज फ्लॉइड याचा बळी गेल्यानंतर वर्णद्वेषाचा मुद्दा पुढे आला व आज त्याला जागतिक स्तरावर आंदोलनाचेही स्वरूप आले आहे. त्यातच क्रिकेटबाबत बोलायचे झाले तर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सामी, ख्रिस गेल यांच्यासह अनेक क्रीडापटूंनी आपले अनुभव व्यक्त केले. सामीने तर आयपीएलमध्ये वर्णद्वेषाचा सामना केल्याचे सांगत धक्का दिला होता. मात्र, यावर बोलताना संघातील सहकारी खेळाडू वेणुगोपाल राव, पार्थिव पटेल व इरफान पठाण यांनी याबाबत आपल्याला काही कल्पना नसल्याचे सांगितले. मात्र, सामीला असा अनुभव आला असेल तर ते अत्यंत निंदनीय आहे.
हे असले प्रकार वेळीच थांबवले गेले पाहिजेत. जर सामीच्या बाबतीत असे घडले असते तर त्याची वाच्यता निश्चितच झाली असती. ही घटना प्रचंड चर्चिली गेली असती तसेच माध्यमांनीदेखील हा मुद्दा उचलून धरला असता, असे मत पठाणने व्यक्त केले.