पुणे -राज्यात 198 साखर कारखाने आतापर्यंत सुरू असून, 138 लाख टन सारखेचे उत्पन्न होण्याचा अंदाज आहे. 106 कारखान्यांनी इथेनॉलाचा पुरवठा केला आहे. त्यामुळे इथेनॉलच्या मागणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यासर्व बाबी लक्षात घेता, साखर कारखान्यांनी यापुढे इथेनॉल, सीबीसी (कॉप्प्रेस्ड बायोगॅस), हायड्रोजन उत्पादनावर भर द्यावा. त्यामुळे कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे दिला.
“व्हीएसआय’ येथील कार्यक्रमात पवार बोलत होते. ते म्हणाले, “वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने जालना जिल्ह्यात 170 एकर जमीन खरेदी केली आहे. त्यावर विविध जातींच्या उसांचे उत्पादन घेतले जात आहे. या पुढील काळात आणखी काही जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून ऊस उत्पादकांसाठी विविध जातीचे ऊस आणि खते उपलब्ध करून दिली जाणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातही अशी एखादी संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न असून त्याचा फायदा त्या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. दरम्यान, भारताने 2021 – 22 मध्ये सर्वाधिक 11 लक्ष टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.
महाराष्ट्राने उत्तर प्रदेशपेक्षा जास्त साखरेचे उत्पन्न मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. सन 2022-23 मध्ये जागतिक पातळीवर कच्च्या साखरेचे उत्पादन 191 दशलक्ष टन होईल, असा अंदाज असून, गेल्या वर्षी 185 दशलक्ष टन साखर उत्पादन झाले होते. तसेच भारताचे साखरेचे उत्पादन 38 दशलक्ष टन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील हंगाम 2021-22 मध्ये भारताने 39 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले होते. हा एक जागतिक स्तरावर उच्चांक प्रस्थापित झाला असून आपण ब्राझिलला मागे टाकले आहे. भारताने 2021-22 हंगामात 12 दशलक्ष टन साखरेची निर्यात केलेली असून जागतिक स्तरावर प्रमुख साखर निर्यातदार देश म्हणून देखील नावलौकिक मिळविला आहे,’ असेही पवार यांनी यावेळी सांगितले.