आपल्याकडे कोणती क्षमता आहे हे खरे आपण जाणतच नसतो. आपल्या प्रत्येकाला मन असतेच, पण आपल्या प्रत्येकाकडे अंतर्मनही असते. याच अंतर्मनाची क्षमता अफाट आहे. त्या अफाट क्षमतेचा आपण कसा उपयोग करून घ्यावा नेमके याचविषयी थोडेसे…
आपले मन हे खूपच कणखर असते. हेच कणखर मन आपले शरीरही कणखर बनविते. आपण जेव्हा आपल्या अंतर्मनाला जागृत करतो तेव्हाच आपण काही चांगली कामगिरी करू शकतो. एखादी अशक्यप्राय कामगिरीही करून दाखवू शकतो. मग त्याला आपली जिद्द, आपला निग्रह, काहीही म्हणा!
आपले अंतर्मन जागृत होण्यासाठी आपले मन मूलतः कणखर बनवायला हवे. जेव्हा काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मन कणखर असणे आवश्यक असतेच. याच कणखर मनातून अंतर्मन जागृत होते. ही आपल्या मनोवस्थेची पुढची पायरी आहे. एकदा का आपले अंतर्मन जागृत झाले की आपण आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक सर्वच क्षमता उंचावू शकतो. किंबहुना उंचावली जातेच आणि याच उंचावलेल्या कामगिरीतून आपल्याला अपेक्षित ते साध्य करता येते.
भारत-पाकिस्तान यांच्यामधील 1965च्या युद्धात आपला सैनिक हवालदार अब्दुल हमीद हे युद्धात खेमकरण येथे तैनात असताना 8 सप्टेंबर 1965 च्या रात्री पाकिस्तानने त्यावेळी अजेय समजले जाणारे पॅटर्न रणगाड्यानिशी हल्ला चढविला. भारतीय सैनिकांकडे पॅटर्न रणगाड्यांविरुद्ध लढण्यासाठी काय होते तर 303 रायफल आणि लाइट मशीन गन! तर अब्दुल हमीद यांच्याकडे गन माउंटेड जीप होती. ती जीप म्हणजे त्या बलाढ्य रणगाड्यांपुढे एखादे कचकड्याचे खेळणेच जणू. अब्दुल हमीद यांनी आपल्या जीपमधून त्या रणगाड्यांच्या कमजोर भागाला लक्ष करून एक एक रणगाडा निकामी करण्यास सुरुवात केली. ते पाहून इतर भारतीय सैनिकांच्याही बाहूमध्ये स्फूरण संचारले आणि त्यांनी कडवा प्रतिकार केला. पाकिस्तानी सैनिकांना पळताभुई थोडी झाली. अब्दुल हमीद नववा रणगाडा निकामी करण्याच्या प्रयत्नात असताना पळून जाणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांनी जाता जाता जो प्रतिहल्ला केला त्यात अब्दुल हमीद जखमी झाले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र बहाल केले गेले.
भारतीय सैनिक आणि अब्दुल हमीद यांच्याकडे तुलनेने कमी क्षमतेची शस्त्रे होती, पण पळून जावे लागले प्रभावी शस्त्रे असणाऱ्या पाकिस्तानच्या सैनिकांना! वास्तविक सगळ्या युद्धात भारतीय सैनिकांची मानसिक अवस्था कणखरच होती. पण समोर शक्तिशाली रणगाडे असताना आणि हातात किरकोळ शस्त्रे आयुधे असताना प्रतिकूल परिस्थितीत केवळ जिंकण्याचीच जिद्द ठेवल्याने जे अब्दुल हमीद व इतर सैनिकांचे अंतर्मन जागृत झाले त्यातूनच ते अशी असमान्य कामगिरी करू शकले.
आपणही अशाच प्रकारे आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी आपले अंतर्मन जागृत करणे आवश्यक असते. त्या अवस्थेत जी कामगिरी उंचावली जाते त्याचा लाभ मिळावा म्हणूनच आपण स्वतःला त्या मनोवस्थेत नेऊन ठेवायचे आहे. त्यासाठी सर्वस्वी झोकून देण्याची तयारी ठेवली पाहिजे. “आर या पार’ हेच आपल्या मनावर आपण ठसवले पाहिजे.
आपल्या जीवनात आपल्याला एखादे ध्येय साध्य करण्यासाठी आपले अंतर्मन दीर्घ कालावधीसाठी जागृत ठेवणे आवश्यक असते. खूप प्रदीर्घ कालावधीसाठी प्रतिकूल परिस्थितीत राहावे लागते. ती आपली खरी अग्निपरीक्षा असते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना खूप यातना सोसल्या, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत अनेक वर्षे राहूनसुद्धा स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्येयापासून ते लांब गेले नाहीत. तेवढी वर्षे त्यांनी अंतर्मन जागृत ठेवले. त्यांनी मनात आलेले नकारात्मक विचार झटकून टाकले. हे सर्व करत असताना त्यांना किती प्रचंड मानसिक क्लेश सहन करावे लागले, हे शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. सावरकरांना शत्रू समोर दिसत नव्हता, पण शत्रू विरुद्ध लढा मात्र शिक्षा भोगत असताना मनातून चालूच होता.
आपल्यालाही सर्व अडचणींना सामोरे जावे लागणार, नकारात्मक विचार येणार, विरोध होणार, नुकसान होणार, असे एक ना अनेक टप्पे आपल्याला पार करत पुढे जावे लागणार. आपण जसजसे पुढे जात राहू तशा समस्याही वाढतच जाणार आहेत. आपण आपलीही शारीरिक व मानसिक तयारी त्या प्रमाणेच वाढवत न्यायची आहे. जेव्हा काही नकारात्मक घडेल, नकारात्मक विचार मनात येतील त्यावेळी सकारात्मक काय घडले, काय घडू शकते याचाही विचार करावा. एखादी छोटीशी सकारात्मक घटना आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन जाते. त्याचबरोबर नकारात्मक घटना आपला निश्चय अधिक दृढ कसा करेल यादृष्टीने पहावयाचे आहे. प्रतिकूल परिस्थितीच बऱ्याच प्रसंगी आपले अंतर्मन जागृत करण्यास कारणीभूत ठरते.
प्रदीर्घ कालावधीसाठी जेव्हा आपल्याला आपले अंतर्मन जागृत ठेवायचे असते त्या काळात आपल्याला काही मानसिक विश्रांती घेण्यासाठी थोडा अवधी मिळतो. या विश्रांती कालावधीत आपण आपल्या मनाला ताजेतवाने बनवायचे आहे. आपण थोडा वेळ आपल्या ध्येयाविषयी विचार न करता इतर काही आपल्या आवडीच्या कामाचा विचार करावा. अशा अल्प विश्रांतीनंतर पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करता येते.
अशा विश्रांतीच्या कालावधीत आपण इतर गोष्टींमध्ये रमून जातो आणि आपल्या मूळ ध्येयापासून लांब लांब जातो. असे टाळण्यासाठी आपल्या ध्येयाशी संबंधी एखादी छोटी वस्तू जसे कोणी लॉन टेनिस खेळत असेल तर चेंडू, सतत आपल्या जवळ ठेवायचा. आपण काम करत नसलो तरी ती वस्तू दिवसातून बऱ्याच वेळा हातात येईल.
ती वस्तू हातात आली की कोणतातरी विचार आपल्या नकळतपणे कामासंबंधी, ध्येयासंबंधी येऊन जाईल. एखादा चांगला विचार नकारात्मक परिस्थितीवर मात करेल, एखाद्या समस्येवर उपाय सुचवेल. अगदीच काही जरी झाले नाही, कोणताच विचार मनात आला नाही तरी आपल्या ध्येयाची आठवण तर निश्चित करून देईल. हेच आपल्याला हवे आहे. आपले अंतर्मन यामुळेच सतत जागृत अवस्थेत राहाणार आहे. जेव्हा दीर्घ कालवाधीसाठी अंतर्मन जागृत ठेवायचे असते त्यावेळी आपले मन सलग क्रमाक्रमाने उंचावत नेले पाहिजे. यामुळे आपले अंतर्मन सतत जागृत ठेवावे.
आपण आपल्या मनमंदिराच्या गाभाऱ्यात बसून आपण आपल्या मनाचा, अंतर्मनाच्या क्षमतेचा सर्वच प्रकारे उपयोग करून घ्यावयाचा आहे. आपण आपल्यातील क्षमता ओळखायची आहे, मग त्यासाठीच आवश्यक त्या सर्व प्रयत्नांचे पुष्प आपल्या मनोदेवतेला अर्पण करावयाचे आहे. आपली मनोदेवता आपल्यावर प्रसन्न होऊन आपले आयुष्यच बदलून टाकेल, यात शंकाच नाही.
– अनिकेत भालेराव