- व्यवसायासोबत बॅंकानाही बसू शकतो फटका
- व्यापारी संभ्रमात ः सराफा व्यवसायात अनिश्चिततेचे वातावरण
- रिजर्व बॅंकेच्या धोरणाबाबत व्यक्त होतेय चिंता
पिंपरी – कोविड 19 विषाणूचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशातील अर्थचक्र बंद पडली. याचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर पडला असला असून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार सुरु बघायला मिळत असून आरबीआयने बॅंकेने सुद्धा याबाबत आपल्या धोरणात बदल केला आहे. याचा वाईट परिणाम बॅंकांवर पडू शकतो असे मत सोन्या-चांदीच्या व्यापार जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चढ उतारामुळे ग्राहकांसोबतच व्यापारी देखील संभ्रमात आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सोने आणि चांदीच्या किंमती जवळपास 20 हजारांनी वाढल्या होत्या. आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात बंद असल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता, ज्यामुळे सोन्याच्या किंमती मोठया प्रमाणात वधारल्या होत्या. मात्र, आता अचानक सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून येत आहेत. सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पहायला मिळाली तर भविष्याची दर वाढण्याचे संकेत बाजारातील तज्ज्ञ मंडळी देत आहेत.
भविष्यात मोठा धोका
याबाबत भांबुर्डेकर ज्वेलर्सचे संचालक विलास भांबुर्डेकर यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले की, हे जर असेच सुरु राहिल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. लॉकडाऊनमुळे बिघडलली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार आणि रिजर्व बॅंक ऑफ इंडियाकडून याबाबत प्रयत्न सुरू आहेत. भारतात सध्या कोट्यवधी तरुण बेरोजगार, ठप्प पडलेलं सेवा क्षेत्र, हजारो उत्पादन कंपन्या बंद आहेत.
सध्या देशात करोनाचा फैलावही मोठया प्रमाणात वाढतच आहे. यामुळे देशाची विस्कटलेली आर्थिक स्थिती पुढील बरेच दिवस पूर्वपदावर येण्याची लक्षणे दिसत नाहीत. बाजारात पैसा खेळता राहण्यासाठी रिजर्व बॅंकेकडून(आरबीआय) मान्यता असणाऱ्या बॅंकांनी सोन्यावर 90 टक्के कर्ज देणे सुरू केले आहे, यापूर्वी 75 टक्के कर्ज दिले जायचे. हे आर्थिक सुधारणेसाठी घेतलेलं पाऊल भविष्यात खूप धोकादायक ठरू शकते.
तर बॅंकांना होऊ शकतो तोटा
रिजर्व बॅंकेला या धोरणामुळे सोन्याच्या बदल्यात पैसा बाजारात येऊन अर्थव्यवहार वाढून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे. पण, सोन्याच्या किंमतीतील ही चढउतार आणि अस्थिरता पाहिली तर भविष्यात बॅंकांनी दिलेल्या कर्जापेक्षा सोने स्वस्त झाले तर बॅंकांना मोठा तोटा होऊ शकतो. आधीच बिघडलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेला हा प्रयत्न उलटू शकतो, असेही मत तज्ज्ञाकडून व्यक्त केले जात आहे.
सतत सोन्या-चांदीच्या भावात होणारी चढ-उतार भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रिजर्व बॅंकेकडून सोने तारणावर दिले जाणारे जादा कर्ज सोन्याचे भाव घसरल्यास बॅंकांना अडचणी निर्माण होऊ शकतात. – विलास भांबुर्डेकर, भांबुर्डेकर ज्वेलर्स मालक