- टाळेबंदी, चक्रीवादळ, मॉन्सूनमधील वादळी पावसाचा मोठा फटका
- उद्योगनगरीत मोठ्या प्रमाणात होते फूलशेती
पिंपरी – टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा, दिवाळीकडून फुलांना चांगला उठाव मिळण्याची अपेक्षा आहे. या हंगामातील निसर्ग चक्रीवादळ, मॉन्सून हंगामातील सततचा वादळी पाऊस, अतिवृष्टीमुळे फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीने कंबरडे मोडल्यानंतर शेतकरी आता नवरात्र, दसरा, दिवाळी या प्रमुख हंगामाच्या आशेवर आहेत. या हंगामात चांगले दर मिळण्याचे संकेत आहेत.
उद्योगनगरीत अशी ओळख लाभलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अजूनही काही भागात शेती केली जाते. विशेषतः महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांमध्ये आजही फूलशेती केली जाते. यामध्ये मोशी, चऱ्होली, डुडुळगाव या गावांचा समावेश आहे. तर खेड तालुक्यातील सोळू, मरकळ ही गावे फुलशेतीवर आधारित असून, याठिकाणची फुले थेट मुंबईतील भुलेश्वर फूल मार्केटला पाठविली जातात. मात्र, यंदा करोनाने या सर्वच गावांमधील फुलशेतीचे नियोजन विस्कटले आहे.
करोना टाळेबंदी काही प्रमाणात शिथील झाल्यावर गणेशोत्सवात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. फुलांची मागणी अंशतः वाढली होती. मात्र गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा झाला. त्यामुळे विशेष फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. गणेशोत्सवानंतर नवरात्र, दसरा दिवाळहे तीनच सण फूल उत्पादकांना चांगले पैसे देणारे ठरतात. यंदा आता करोना संकटातून शेतकरी सावरत आहेत.
काही शेतकऱ्यांनी आता दसर दिवाळीसाठीचे नियोजन करुन, लागवडी केल्या आहेत. मात्र, आता लांबलेला मॉन्सून, परतीच्या मॉन्सूनचा देखील लांबलेला प्रवास, याचा परिणाम काय होतो, यावर दसरा, दिवाळीतील फुलांची आवक आणि मागणी अवलंबून राहिल. दर आतापेक्षा नक्की वाढतील, अशी शक्यता आहे.
यंदाचा फूलांचा हंगाम लाभदायक ठरलेला नाही. काही प्रमुख सण सोडले, तर मागणी कमीच आहे. करोना टाळेबंदीमध्ये सुमारे तीन महिने फूल बाजारासह निर्यात देखील बंद होती. फुले हे जीवनावश्यक आणि फळे, भाजीपाल्यासारखा आहारातील वस्तू नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.
गणेश आहेर, मातोश्री पुष्प भांडार पिंपरी