सिंहगडरस्ता, दि. 14 (प्रतिनिधी) – पुणे मनपाकडून क्षेत्रीय कार्यालयामार्फत तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात येत असले, तरी यातील बहुतांशी ध्वज सदोष आहेत. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात वाटप करण्यात आलेल्या ध्वजातही त्रुटी निघाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे क्षेत्रीय कार्यालयामधील अधिकारीही हवालदिल झाले होते. त्यांनी नागरिकांना ध्वज निवडीचा पर्याय दिला, नागरिकांनी काटेकोर पाहणी करून ध्वज निवडून घेतले.
तिरंग्याच्या मानकाप्रमाणे त्याची लांबी, रुंदी नाही. अशोक चक्रचा आकार अंडाकृती झाला आहे. ध्वजावर डागही आहेत. तसेच शिलाई अतिशय निकृष्ट दर्जाची आहे. काही ध्वज चुकीच्या पद्धतीने कापले गेले आहेत. तिरंग्यासाठी कापडही हलक्या प्रतीचे वापरले आहे. अशोक चक्राची जागा मध्यभागी पाहिजे ती थोडीशी बाजूला सरकली आहे. मानकाप्रमाणे ध्वज देणे हे प्रशासनाचे काम आहे. परंतु, चुकीच्या पद्धतीचे तिरंगा देऊन अपमान केला गेल्याचे नागरिकांनी सांगितले.
घरोघर तिरंगा अभियानासाठी कंत्राटदाराला पुरेसा वेळ मिळाला नसावा. एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढी मोठे प्रमाणात ध्वज तयार करणे सोपे नाही त्यामुळे यामध्ये हलगर्जीपणा झालेला दिसतो. पोस्टामधून जे काही ध्वज उपलब्ध आहेत, त्यामध्ये कमी प्रमाणात दोष आहेत. अशा स्थितीतही नागरिकांनी उत्साह आणि जल्लोष वाढतो आहे.
– भीमराव तापकीर, आमदार, खडकवासला मतदारसंघ
तिरंगा हा राष्ट्राचा अभिमान आहे. घरोघर तिरंगा लावायचा होता तर त्याचे नियोजन अगोदरपासूनच व्हायला पाहिजे होते. म्हणजे गडबड झाली नसते. तिरंग्याचे कापड, प्रिंटिंग, अशोक चक्र ,लांबी रुंदी मानकाप्रमाणे पाहिजे. परंतु, यामध्ये प्रशासनाचा गोंधळ उडाल्याचे दिसते. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखलाच गेला पाहिजे.
– काका चव्हाण, राष्ट्रवादी पदाधिकारी