अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून गर्दीचे नियोजन नाही
सोनई – करोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी केंद्र व राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्याबाबत जनजागृती करत आहेत. सोशल डिस्टन्सिंगवर भर देण्याचे आवाहन करत आहेत. मात्र सोनईत महाराष्ट्र बॅंकेच्या शाखेतच या सूचनांना हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी कुठलीही उपाययोजना शाखेतर्फे करण्यात आलेली नाही. त्यामुळे करोनाचा धोका वाढला आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात शासनाने लॉकडाऊन केले आहे. तसेच वारंवार हात धुण्याचे व घरात बसण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. तसेच गरजेच्या वस्तू घेण्यासाठी घराबाहे पडल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केरण्यात येत आहे. मात्र सोनई येथील महाराष्ट्र बॅंकेच्या शाखेत या मोहिमेचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच विसर पडल्याचे तेथे होणाऱ्या गर्दीवरून दिसून येते. सध्या बॅंकेत खातेदारांची मोठी गर्दी होत आहे.
त्यामुळे दोन ग्राहकांच्या मध्ये किमान एक मीटरचे अंतर असावे, बॅंकेत सॅनिटायझरची सोय असावी, अशी कोणतीही व्यवस्था व्यवस्थापनाकडून करण्यात आलेली नाही. या विषयी बॅंकेचे शाखाधिकारी नंदकुमार तळपे यांना विचारले असता, त्यांनी आमच्याकडे सॅनिटायझर आहे. आमचे कर्मचारी मास्क वापरतात. पण जेव्हा सर्व्हर बंद पडतो, तेव्हा कामकाज थांबल्याने गर्दी वाढते, असे त्यांनी सांगितले.