कोपरगाव – जुनं ते सोनं ही तशी जुन्या लोकांची म्हण आता नव्या आधुनिक युगातील लोकांना पटू लागली आहे. बाजारात येणाऱ्या रसायनयुक्त भाजीपाला व धान्यामुळे त्याचे परिणाम आरोग्यावर होऊ लागल्याने अनेक जण सेंद्रिय भाजीपाला व धान्यास प्राधान्य देत आहेत. मात्र असे असताना अनेक जुन्या धान्य पिकांचे वान नष्ट झाले आहेत. असे असतानाही प्रतिकूल परिस्थितीत बोरावके परिवानाने लोप पावलेल्या खपली गव्हाचे पीक घेऊन जुने वाण जपण्याचा प्रयत्न केला आहे.
हरितक्रांती होण्यापूर्वी प्रत्येकाच्या ताटात मालदांडी ज्वारी, कसदार बाजरी, खपली गव्हाच्या पोळ्या-भाकरी दिसत होत्या. मात्र हरितक्रांती झाली अन् पिकांवर रसायनांचा मारा करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होऊ लागले. त्यामुळे जुने वाण नामशेष होत गेले. मात्र या रसायनयुक्त पिकांचा आरोग्यावर परिनाम होत असल्याचे आता सिद्ध होऊ लागले आहे. त्यामुळे हे जुने वाण पुन्हा काही शेतकरी आपल्या शेतात पिकवू लागले आहेत. तालुक्यातील बोरावके परिवाराने नामशेष झालेल्या खपली गव्हाचे पीक घेऊन पुन्हा विषमुक्त शेतीकडे पाऊल टाकले आहे.
काही तुरळक ठिकाणी या गव्हाचे पीक घेतले जाते. काही शेतकरी खान्यासाठी या वाणाची लागवड करत आहेत. त्यामुळे हा गहू विकत मिळणे अवघडच. इतर गव्हाच्या तुलनेत खपली गव्हाचा दर सर्वाधिक असतो. असा लोप पावलेला खपली (जोड) गहू कोपरगाव तालुक्यातील खडकी परिसरातील शेतकऱ्याने पिकवून जुन्या वाणाची जपनूक केली आहे. हरिभाऊ बोरावके व अण्णासाहेब बोरावके या बंधूनी आपल्या एक एकर शेतात खपली गव्हाचे पीक घेतले आहे आहे. बोरावके यांच्या शेतातील गहू पाहण्यासाठी इतर शेतकरी येत आहेत. हरिभाऊ बोरावके म्हणाले, सध्या बाजारात मिळणारा गहू हा आरोग्याला अपेक्षित असे पोषण देत नाही.
कसदार अन्न शरीराला मिळत नसल्याने वारंवार आजारी पडणे, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग अशा आजाराचा सामना करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. त्यामुळे आयुर्मानही घटले आहे. त्याचा विचार करून जुन्या वाणांकडे आपण वळालो आहोत. उत्पन्न कमी झाले तरी चालेल पण खपली गव्हाचे पिक घेतले. खपली गव्हाचे बियाणे अनेक ठिकाणी प्रयत्न करून देखील मिळाले नाही. त्यामुळे ते बाहेरून मागवले. या बियाण्याची जपणूक करून सध्या पीक घेत आहोत.
राजेंद्र बोरावके म्हणाले, खपली गव्हाचे पीक घेताना खूप मेहनत घ्यावी लागली. खर्च जास्त उत्पन्न अतिशय कमी आहे. इतर गव्हाच्या तुलनेत खपली गव्हाचा दर कमीत कमी 90 रुपये किलो आहे. एतके पैसे मोजूनही हा गहू बाजारात मिळत नाही. याचा विचार करूनच आम्ही या गव्हाची लागवड केली. भविष्यात बीजमाता राहीबाई पोपेरे यांचे मार्गदर्शन घेऊन जुने बियाणे जपणार आहे.