सातारा – सातारा शहर व कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हेगारी टोळ्यांमधील जीवन शहाजी रावते, अभिजीत अशोक भिसे (रा. दत्तनगर,कोडोली, सातारा), अभिषेक विलास चतुर, सौरभ प्रकाश चतुर, आकाश प्रकाश चतुर (रा. नांदगिरी, ता. कोरेगाव) यांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
दोनच दिवसांपूर्वी पाच गुन्हेगारी टोळ्यांमधील पंधरा जणांना तडीपारीचे आदेश बजावण्यात आले होते. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशानुसार झालेल्या या कारवायांमुळे गुन्हेगारी जगत हादरले आहे.
याबाबत माहिती अशी, रावते व भिसे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात चोऱ्या, घरफोडी, जबरी चोरी, मारामारी, प्रकरणी, तर अभिषेक, सौरभ व आकाश चतुर यांच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, लुटमार, मारहाण, गर्दी जमवून मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे दाखल करून आणि प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वागणुकीत बदल होत नसल्याने. सातारा शहरचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, कोरेगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी संशयितांवर तडीपारीच्या कारवाईचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवले होते. त्यावर सुनावणी घेऊन बन्सल यांनी संशयितांना जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला.
आदेश मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, अण्णासाहेब मांजरे, प्रभाकर मोरे यांना पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, हवालदार प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी सहकार्य केले.
गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरूच
बन्सल यांनी पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून 86 जणांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे. झोपडपट्टीदादा निर्मूलन कायद्यानुसार दोघांवर स्थानबद्दतेची, तर 53 जणांवर “मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.