सातारा, (प्रतिनिधी)- सध्या प्रचंड उकाडा असून 40 अंशाच्या दरम्यान तापमान आहे. त्यातच वादळीवाऱ्यासह वळिवाचा पाऊस पडत आहे. शहर व परिसरात विद्युत पुरवठा त्वरीत बंद पडतो आहे किंवा जाणीवपूर्वक बंद केला जात आहे. अचानक विद्युत पुरवठा बंद केल्याच्या प्रकारामुळे घरातील विद्युत उपकरणे जळत आहेत.
त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. दिवसा विद्युतपुरवठा बंद केल्यामुळे उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. हे थांबले नाही तर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी महावितरण कंपनीला निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, सध्या थोडा पाऊस पडला तरी सातारा शहर व परिसरातील विद्युत पुरवठा त्वरीत बंद पडतो आहे किंवा जाणीवपूर्वक बंद केला जात आहे. विद्युत पुरवठा बंद पडल्यानंतर आपल्या कार्यालयास फोन केल्यानंतर आपल्याकडे त्याची ठराविक कारणे तयार असतात.
सध्या वळीवाच्या पावसामुळे विद्युत पुरवठा खंडीत होत असेल तर जूनमध्ये पावसाळा सुरु झाला तर आपण पूर्ण पावसाळा हंगामामध्ये वीज पुरवठा बंद ठेवणार आहात काय, महावितरण कंपनीने जरा सर्वसामान्य जनतेचा विचार करावा. सर्वसामान्य जनतेला बिल भरण्यास थोडा वेळ झाला तर आपण त्वरीत त्याचा इतिहास न पाहता विद्युत पुरवठा तोडता. 31 मार्चला आपण सर्व बिले वसुल करुन घेता.
आपण वसुलीची मोहिम राबवता तशी पुरवठा न थांबण्यासाठी मोहिम राबवा. रात्र रात्र वीज नसेल तर नागरिकांची काय अवस्था होत असेल याचा सहानभूतीपूर्वक विचार करावा. तसेच अचानक लाईट गेल्यामुळे नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रीक उपकरणे जळतात व त्याचाही त्रास आपल्यामुळे नागरिकांना सहन करावा लागतो.
सध्या दिवसा वीज बंद होण्याचे प्रकार रोजच घडत आहेत. त्यामुळे उद्योग व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. येथून पुढे अशीच परिस्थिती राहिली तर कार्यालयाच्यासमोर जनतेच्यावतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.